नवी दिल्ली, दि. 25 – देशात करोनाच्या साथीमुळे लॉकडाऊन लागू झाल्याची वर्षपूर्ती झाली. या लॉकडाऊनने संपूर्ण देशाला अनेक धडे दिले. याच लॉकडाऊनच्या काळात देशात कौटुंबिक हिंसाचारात आणि महिलांवरील आत्यचारामध्ये वाढ झाली असल्याचे उघड झाले आहे.
2019 ते 2020 या एका वर्षाच्या काळात राष्ट्रीय महिला आयोगाकडे नोंद झालेल्या कौटुंबिक हिंसाचाराबाबतच्या तक्रारी 2,960 वरून 5,297 इतक्या वाढल्या आहेत. लॉकडाऊनच्या वर्षात बहुतेक नागरिक आपापल्या घरातच होते. त्यामुळेच या काळात कौटुंबिक हिंसाचारात वाढ झाली आहे.
2019 या वर्षात महिलांवरील आत्याचाराच्या 19,730 तक्रारी महिला आयोगाकडे आल्या होत्या. तर 2020 या वर्षात याच तक्रारींची संख्या 23,722 इतकी झाली होती. लॉकडाऊनचे एक वर्ष उलटून गेल्यानंतरही महिला आयोगाकडे दर महिन्याला 2 हजार तक्रारी मिळतच आहेत. त्यापैकी एकचतुर्थांश तक्रारी कौटुंबिक आत्याचाराशी संबंधित असतात.
जानेवारी 2021 ते 25 मार्च 2021 या कालावधीत महिलांवरील घरगुती हिंसाचाराच्या 1,463 तक्रारी आल्या. मागील वर्षी करोनाच्या साथीला रोखण्यासाठी 25 मार्चला देशव्यापी लॉकडाउन लागू करण्यात आला होता. परंतु यामुळे बऱ्याच महिला घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरल्या आणि घरातील व्यक्तींच्या गैरवर्तनात त्या अडकून पडल्या.
लॉकडाऊन लागू झाल्यापासून महिला आयोगाकडे कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी यायला लागल्या होत्या. त्याचे प्रमाण इतके वाढले की महिला आयोगाला या तक्रारींसाठी स्वतंत्र व्हॉटस ऍप क्रमांक जाहीर करावा लागला. जुलैमध्ये अशा 660 तक्रारी नोंदल्या गेल्या. एप्रिल 2020 पासून आतापर्यंत महिलांवरील गुन्ह्यांच्या 25,886 तक्रारी आल्या आहेत. त्यामध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारींच्या संख्या 5,865 आहे. 2020 वर्षात महिलांविरोधातील तक्रारीही गेल्या 6 वर्षातील सर्वाधिक म्हणजे 23, 722 इतक्या नोंदवल्या गेल्या आहेत.
आर्थिक असुरक्षितता, वाढलेला तणाव, चिंता, आर्थिक चिंता आणि भावनिक आधाराचा अभाव यामुळे 2020 मध्ये बऱ्याच घटनांमध्ये घरगुती हिंसाचार घडलेला असावा, असे मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा सावंत यांनी व्यक्त केले. तर महिलांबाबतच्या कायद्यांची जागृती आणि तक्रार नोंदवण्याच्या वाढलेल्या मानसिकतेमुळेही हे प्रमाण अधिक दिसत असावे असे महिला कार्यकर्त्या योगिता भयाना यांनी म्हटले आहे.