नवी दिल्ली : देशातील करोना रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने केंद्र सरकारने निर्बंध शिथील केले होते. त्यातच आता पुन्हा एकदा रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. दिल्लीतही रुग्णसंख्या वाढल्याने आता मास्क बंधनकारक करण्यात आले आहेत. तसेच नियम न पाळणाऱ्यांना ५०० रुपये दंड ठोठावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दिल्लीच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने राजधानीत मास्क घालणे बंधनकारक केले आहे. मास्कशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि ५०० रुपये दंड आकारला जाईल असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सरकार मास्क न घातल्यास दंडवसुली करण्याचा कोणताही विचार करत नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी ते म्हणाले की, “करोना अजून बराच काळ राहणार असल्याने आपल्याला त्याच्यासोबत जगण्याची सवय केली पाहिजे. जर रुग्णसंख्या वाढली तर आम्ही कठोर निर्णय घेऊ”.
“सध्या रुग्णसंख्या कमी असल्याने जास्त चिंता करण्याची गरज नाही. तज्ज्ञ तसेच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासोबत आज बैठक होणार असून परिस्थितीची आढावा घेतला जाईल,” असे यावेळी मनिष सिसोदिया यांनी सांगितले. दरम्यान दिल्लीतील रुग्णसंख्येत गेल्या २४ तासात २६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे पहायला मिळाले आहे. पण पॉझिटिव्हिटी रेट ४.४२ टक्क्यांवर घसरला आहे.