सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचे एकूण 22 गुन्हे दाखल
पिंपरी (प्रतिनिधी) – लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवरील हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचे एकूण 22 गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी पोलिसांवर हल्ल्याचे 19 गुन्हे आहेत. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी हजारो नागरिकांवर गुन्हे दाखल केले. यामुळे बऱ्याचदा पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये वाद निर्माण झाले. बहुतेकवेळा पोलिसांनी नागरिकांवर गुन्हे दाखल करत परिस्थिती नियंत्रणात आणली तर काही वेळा नागरिकही उग्र झाल्याचे पहायला मिळाले.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली होती. यामध्ये जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेशही लागू केले होते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर हजारो नागरिकांवर पोलिसांकडून भा. द. वि. कलम 188 अनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत होता. लॉकडाऊनच्या काळात करोनाचे भय, पोलिसांवरील वाढता ताण, अनेक बाबी मिळत नसल्याने शोधात बाहेर पडत असलेले नागरिक तर आर्थिक अडचणी अडकल्याने बाहेर पडत असलेले नागरिक अशी संपूर्ण तणावपूर्ण स्थिती होती. तणावाच्या परिस्थितीतही पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याचे काम सुरूच ठेवले. यामुळे अनेक ठिकाणी पोलीस आणि नागरिकांमध्ये वाद होतच होते. यातूनच पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना घडल्या आहेत.
मागील वर्षी 1 जानेवारी ते 30 जून 2019 या कालावधीत सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचे एकूण 23 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी पोलिसांवर हल्ल्याचे 13 गुन्हे होते. यंदाच्या वर्षी याच कालावधीत सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचे 22 गुन्हे दाखल आहेत. यापैकी पोलिसांवर हल्ल्याचे 19 गुन्हे दाखल आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत पोलिसांवरील हल्ल्याचे सहा गुन्हे वाढले आहेत. तर पोलीस वगळता इतर सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचे गुन्हे सातने घटले आहेत. यामध्ये मे महिन्यात चार तर जून महिन्यात चार असे दोन महिन्यात आठ गुन्हे दाखल झाल्याची नोंद पोलिसांच्या दप्तरी नोंद आहेत. तर याच महिन्यात पोलीस कर्मचारी वगळता एकाही सरकारी नोकरावर हल्ला झाल्याची नोंद नाही. तर यंदाच्या वर्षी पहिल्या सहामाहीमध्ये पोलीस कर्मचारी वगळता सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ल्याचे तीन गुन्हे दाखल आहेत.