पुणे – भारतीय संस्कृतीत प्रत्येक आजाराचे निदान नैसर्गिकरित्या बरे करण्याचे तंत्रज्ञान आहे. जसजसे आपण आधुनिक होत आहोत त्याप्रमाणे रोगांची संख्या वाढत आहे. अशा सर्व रोगांवर मात करण्यासाठी आयुर्वेदिक वनस्पतींचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. आता आपण त्यातल्याच काही महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची माहिती घेणार आहोत. तुम्ही या वनस्पतींना हिरव्या देवता देखील म्हणून शकता.
1. कडूनिंब – हे झाड सर्वांच्याच ओळखीचे आहे. त्याची पाने, फळे, तसेच खोड औषधी आहेत. इसबासारख्या त्वचेच्या रोगाकरता याच्या पानांचा उपयोग होतो. कडूनिंबाच्या पानांच्या तेलाचा वापर खाज आणि जखमा भरून येण्यासाठी करतात. तसेच या पानांचा उकळून काढा करूनही वापरता येतो. कडूनिंब हे एक उत्तम जंतुसंसर्गनाशक आणि कीटकनाशक आहे. त्याच्या खोडाच्या बाहेरील भागाचा काढाही बऱ्याच आजारांवर उपायकारक ठरतो.
2. तुळस – तुळस म्हणजे ‘वनस्पती लहान पण गुण महान’ असे आहे. तुळशीची पानं ही सर्दी खोकल्यावर विशेष गुणकारी आहेत. तुळशीच्या पानांचा रस मधात घालून किंवा पानांचा काढा करून खोकल्यासाठी देतात. तुळशीची पानं उष्ण असतात म्हणून ती कफदोषामध्ये वापरतात. ही पानं आपण नुसतीदेखील चावून खाऊ शकतो.
3. कोरफड (कुमारी) – या वनस्पतीचा उपयोग जखमेवरची मलमपट्टी म्हणून छान होऊ शकतो. जखमेच्या आकाराचा कोरफडीचा तुकडा कापा. जखम धुऊन घ्या. तुकडयाची ओली बाजू जखमेवर ठेवून वरून पट्टी बांधा. कोरफड पट्टी रोज बदला. याने जखम लवकर बरी होईल. भाजल्यामुळे झालेल्या जखमांवरदेखील कोरफडीची मलमपट्टी लागू पडते. बऱ्याच आयुर्वेदिक औषधांमध्ये कोरफडीचा उपयोग केला जातो. यकृताचे आजार, स्त्रियांचे आजार आणि खोकला यावर हे खूप गुणकारी आहे.
good information