मुख्यमंत्र्यांची केंद्रिय आरोग्य मंत्र्यांकडे मागणी
मुंबई – मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासप्रवर्गात (एसईबीसी) तसेच सवर्णांना आर्थिक दुर्बल घटकांत (ईडब्ल्यूएस) आरक्षण दिल्याने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत होती. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रिय आरोग्य मंत्र्यांकडे वैद्यकिय अभ्यासक्रमाच्या 2500 जागा वाढविण्याची मागणी केली.
मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची भेट घेतली. यावेळी एसईबीसी आणि आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढवून देण्यात याव्यात, अशी मागणी केली. हर्ष वर्धन यांना राज्य सरकारच्या वतीने विनंतीपत्रही फडणवीस यांनी दिले. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शाखेच्या 813 जागा, तर पदवी शाखांमध्ये 1740 जागा वाढवून देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीवर सकारात्मक आणि वेगाने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. हर्ष वर्धन यांनी दिले.
दुष्काळी उपाययोजनांची दिली माहिती
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व नवे गृहमंत्री अमित शहा यांचीही देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. महाराष्ट्राच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले. यावेळी विविध विषयांवर चर्चा करतानाच केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळालेली दुष्काळ निवारणासाठीची मदत आणि राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांचीही भेट घेत देशाचे संरक्षण मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.