गोंदवले ग्रामीण रुग्णालयातील परिस्थिती
गोंदवले – गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे आरोग्य सेवा पूर्णत: विस्कळीत झाली असून गेले 21 दिवस हा गंभीर प्रकार रुग्णालयात सुरू आहे. केवळ कर्मचाऱ्यांच्या जीवावर हे रुग्णालय सुरू आहे. मात्र वरिष्ठ पातळीवर ही बाब गांभीर्याने घेतली जात नाही. त्यामुळे लवकरच गोंदवलेकर ग्रामस्थ याबाबत खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना भेटणार असून याबाबत निवेदन देणार असल्याचे साहेबराव शेडगे यांनी सांगितले.
गोंदवले खुर्द, (ता. माण) येथे ग्रामीण रुग्णालयात या ठिकाणी एक वैद्यकीय अधीक्षक आणि चार वैद्यकीय अधिकारी अशी पदांची रचना आहे. मात्र एक वैद्यकीय अधिकारी हे पद केवळ कार्यरत असून बाकीची पदे फक्त नावाला आहेत.
येथे कार्यरत असणारे डॉ. के. पी. कदम हे वैद्यकीय अधिकारी अधिकृतपणे वैद्यकीय रजेवर गेले असून त्यांच्या ठिकाणी दुसऱ्या डॉक्टरांची नेमणूक तत्काळ होणे गरजेचे होते मात्र इथे कोणही डॉक्टर उपलब्ध झाले नाहीत. त्यानंतर कराड येथील एका वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली त्यांनीही दोन-तीन वेळा हजेरी लावत पुन्हा या आदेशाला कोलदंडा दाखवत इकडे न येणे पसंत केले. त्यानंतर रुग्णाची फार गैरसोय होतेयं म्हणून अन्य एका डॉक्टरांची नेमणूक केली तीही 21 दिवसांनी. असा प्रकार सुरू असून यावर वरिष्ठांकडून कोणताही विचार केला गेला नाही. या ठिकाणी गेल्या आठ वर्षांपूर्वी डॉ. लादे हे पूर्ण वेळ वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्यानंतर मात्र एकदाही पूर्ण वेळ अधिकारी मिळाले नाहीत. आजपर्यंत वरिष्ठांनी केवळ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे अधिभार सोपवून स्वत: रिकामे होत आहेत. रुग्णसेवेबद्दल कुणालाही देणे-घेणे नसून केवळ दिवस भरण्याचं काम सुरू आहे.
गोंदवले परिसरातील गावांमधील लोकांनाही या रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असून गावोगावी चारा अन् पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात भासत असून सर्वसामान्य शेतकरी लोकांनी चाऱ्यासाठी जनावरांना छावणीत दाखल केले आहे. अनेक वेळा चारा घेऊन जनावरांना घालताना किंवा बारीक करताना हाताला पायाला लहान मोठ्या जखमा होत आहेत.
मात्र यासाठी उपचार घ्यायला रुग्णालयात आल्यावर इथे वैद्यकीय अधिकारी गैरहजर असतात परिणामी गावात कुठे आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याने दुखणं अक्षरशः अंगावर काढण्याची वेळ या लोकांवर येत आहे. गावात एवढ मोठं रुग्णालय असून सुध्दा रुग्णांना याचा लाभ घेता येत नाही. याठिकाणी गेल्यावर वैद्यकीय अधिकारी रजेवर गेले असून बाकीचे कर्मचारी उपस्थित असतात अनेक वेळा रुग्ण आल्यावर डॉक्टर नसल्याने याच कर्मचाऱ्यांना किरकोळ उपचार आणि मलमपट्टी करून रुग्णाची समजूत काढावी लागते. त्यानंतर डॉक्टरांना फोन करून बोलवलं जाते, अशी इथली पद्धत आहे. त्याचबरोबर वयाचे दाखले देण्याचे अधिकार फक्त ग्रामीण रुग्णालयात असून त्याही लोकांची गैरसोय होत आहे.
यावर उपाय लवकर करण्यात यावा आणि पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी मिळावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून जर वैद्यकीय अधिकारी मिळाले नाहीत तर खासदार रणजितसिंह निंबाळकर याना निवेदन देण्यात येणार असल्याचे साहेबराव शेडगे यांनी सांगितले.
लोकांच्या भावना आम्ही समजू शकतो. आमच्याकडे डॉक्टरांची संख्या कमी असून तिकडे डॉक्टर द्यायचे कुठले? असा आम्हाला प्रश्न पडला आहे. आम्ही तरी काय करणार?
-डॉ. श्री काटकर , निवासी वैद्यकीय अधीक्षक सातारा