प्राप्तिकराचे नियोजन हा वार्षिक आर्थिक नियोजनाचा अविभाज्य भाग आहे. काही विशिष्ट साधानांद्वारे गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या करप्राप्त उत्पन्नातून सवलतीस पात्र ठरू शकता. प्राप्तिकर कायद्यातील कलम 89 सी नुसार ही सवलत मिळते. त्यानुसार गुंतवणुकीचा सगळ्यात लोकप्रिय प्रकार म्हणजे म्युच्युअल फंडांच्या इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस) मध्ये गुंतवणूक करणे.
विविध कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक असणाऱ्या ईएलएसएस योजनांमधून गुंतवणुकीवर परतावा तर मिळतोच त्याचबरोबर प्राप्तीकरात सवलत असा दुहेरी फायदा होतो. ईएलएसएस फंड तुम्ही गुंतवलेले पैसा शेअरबाजारातील विविध क्षेत्रातील आणि विविध आकारांच्या (लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप) कंपन्यांमध्ये गुंतवतात. त्यातून तुमच्या गुंतवणुकीवर दीर्घकाळात चांगला परतावा तयार होतोच पण दरवर्षी तुम्हांला प्राप्तिकरात ठराविक सवलत मिळत राहते.
अर्थात या फंडांमधील रक्कम गुंतवणुकीच्या तारखेपासून किमान तीन वर्षे काढून घेता येत नाही. कलम 80 सी नुसार पीपीएफ आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रातील गुंतवणुकीवरही प्राप्तिकरात सवलत मिळते. मात्र पीपीएफचा लॉक इन कालावधी 15 वर्षे तर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांसाठी तो पाच वर्षे इतका आहे. अर्थात पीपीएफ आणि एनएससीमधील गुंतवणूक अधिक सुरक्षित मानली जाते. ईएलएसएस लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे संपत्ती वृद्धी करण्याचे आणि त्याचवेळी प्राप्तिकरात सवलत आणि कमी लॉकिंग कालावधी.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी एसआयपी आणि एकरकमी (ज्याला लमसम म्हटले जाते) गुंतवणूक असे दोन मार्ग उपलब्ध आहेत. या दोन्ही पद्धतीत गुंतवणुकीच्या दिवशी त्या योजनेची जी एनएव्ही (नेट असेट व्हॅल्यू) असेल त्याच्या पटीत तुम्हांला युनिट मिळतात.
तुमच्या गुंतवणुकीचा प्रवाह (कॅश फ्लो) कसा वाहतो यामध्येच याचे गुपित दडलेले आहे. जेव्हा तुम्ही एकरकमी गुंतवणूक करता तेव्हा त्या दिवसाच्या एनएव्हीनुसार तुम्हांला युनिट मिळतात. एसआयपीमध्ये दर महिन्याला किंवा नियमित कालावधीत गुंतवणूक होत राहिल्याने बाजारातील चढउतारानुसार कमी-जास्त युनिट मिळत राहतात आणि सरासरीचा विचार करता एसआयपी फायदेशीर ठरते. त्यामुळेच दर महिन्याला वेतनातून ठराविक रक्कम कपात होऊन एसआयपीद्वारे तुम्ही निवडलेल्या ईएलएसएस फंडात जमा होत राहणे हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. आता दरमहा ठराविक रक्कम भरणे तुमच्यासाठी शक्य नसेल तर मग एकदम रक्कम भरण्याचा मार्ग निवडणे योग्य.
ईएलएसएस फंडात गुंतवणूक करताना तुम्ही वैयक्तिक आर्थिक उद्दिष्ट आणि जोखीम पचवण्याची ताकद या गोष्टींचा विचार केला पाहिजे. शेवटी एकरकमी गुंतवणूक करायची की एसआयपीद्वारे दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवत राहायची हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. परंतु अनेक कारणांसाठी एसआयपी ही गुंतवणुकीची आदर्श पद्धत आहे. ईएलएसएसमध्ये गुंतवणूक करताना प्राप्तीकर सवलत मिळण्याबरोबर त्यातून संपत्ती निर्मिती म्हणजेच परतावा मिळण्याचेही नियोजन करा. त्यासाठी सलग पाच ते सात वर्षे गुंतवणूक करत राहण्याचे उद्दिष्ट ठेवा.