डॉ. भास्कर मोरे यांची राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
जामखेड (प्रतिनिधी) : महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेत आयुष उपचार पद्धतीचा समावेश करण्याची मागणी रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना ही सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांसाठी अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. मात्र महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेत फक्त अॅलोपॅथिक उपचार पद्धतीनुसार उपचार करण्यात येतात. परंतु आयुष उपचार पद्धती ही सर्व सामान्य लोकांना परवडणारी किफायतशीर पद्धत असुन या उपचार पद्धतीनुसार उपचार घेणाऱ्यांची वाढती संख्या पाहता या उपचार पद्धतीचा महात्मा फुले जीवनदायी योजनेत समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे.
“कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेतंर्गत केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने आर्सैनिक अल्बम 30 हे होमिओपॅथिक औषध प्रभावी असल्याचे नमूद करून जास्तीत जास्त लोकां ना वाटप करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार निश्चितच आयुष उपचार पद्धतीचा महात्मा फुले जीवनदायी योजनेत समावेश करणे लोकहिताचे आहे.
डॉ. वर्षां भा.मोरे (सचिव,रत्नदीप होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, जामखेड)
आयुष अंतर्गत आयुर्वेद,योगा,युनानी,सिद्धा व होमिओपॅथी या उपचार पद्धतींचा समावेश आहे. यापैकी महाराष्ट्र राज्यात आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार घेणार्या रुग्णांची संख्या काही लाखात आहे. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेत आयुष उपचार पद्धतीचा समावेश करून राज्यातील शासकीय व शासन मान्य खाजगी आयुष वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयात ही योजना कार्यान्वित करण्यात यावी अशी मागणी रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर या संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे,जामखेड-कर्जत चे आमदार रोहीत पवार व मा. डॉ. सुधाकर शिंदे, आयुक्त,महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना मुंबई यांच्याकडे केली आहे.
“होमिओपॅथिक उपचार पद्धती ही अत्यंत प्रभावी व सर्व सामान्य लोकांना किफायतशीर अशी उपचार पद्धती आहे. त्यामुळे या पद्धतीचा प्रसार व प्रचार करण्यासाठी या योजनेचा महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेत समावेश झाला पाहिजे.
-डॉ.राजेश्वरी रापटा,(प्राचार्य, रत्नदीप होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, जामखेड )