बिहार – शिस्तबद्ध अधिकारी म्हणून लौकीक असलेली इनायत खान, शेखपुरा, बिहारची जिल्हाधिकारी आहे. गतवर्षी पुलवामा येथील हुतात्म्यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण करुन ती चर्चेत आली. तिने या हल्ल्यात शहीद झालेल्या बिहारच्या सीआरपीएफ सैनिक रतनकुमार ठाकूर आणि संजय सिन्हा यांच्या प्रत्येकी एका मुलीला दत्तक घेण्याची घोषणा केली. इनायत या दोघींच्या शिक्षणाची आणि पालनपोषणाची काळजी घेईल. तसेच त्यांनी दोन शहीद जवानांच्या कुटुंबीयांना दोन महिन्यांचा पगार दिला आहे.
इनायत खान यांची शिस्तबद्ध अधिकारी म्हणून ओळख आहे. वर्ष 2007 मध्ये सिव्हिल सर्व्हिसेस परिक्षेत त्यानी 66 वा क्रमांक मिळविला आणि त्यांना बिहार कॅडरने सन्मानित केले. इनायत मूळच्या उत्तर प्रदेशातील आग्राच्या रहिवासी आहेत. नागरी सेवेत रुजू होण्यापूर्वी 2007 मध्ये अभियांत्रिकीचा अभ्यास पूर्ण केल्यावर त्यांनी एका वर्षासाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीत काम केले.
पण, हेतू काही वेगळा होता म्हणून नोकरी सोडून त्या आयएएस झाल्या. त्यांच्या नियुक्तीनंतर बिहारमधील सरकारी यंत्रणेची उथळ वृत्ती सुधारल्याचे मानले जाते. त्यांनी कारकुनी प्रवृत्तीवर आणि बाबूंच्या मनमानीवर बंदी घातली. विशेष म्हणजे बिहारच्या सामाजिक पार्श्वभूमीवरही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.
तुम्ही तुमच्या कृतीतून इतरांसाठी आदर्श निर्माण करा; त्यासाठी कोणा बाह्य प्रेरणेची वाट पाहू नका, असे इनायत खान आवर्जून सांगतात, तेव्हा त्यांच्याविषयी आदरच वाढतो.