गुलमर्ग – दहशतवाद्यांच्या जखडातून मुक्त होत असलेल्या जम्मू आणि कश्मिरमध्ये येत्या काळात जगाला हेवा वाटेल असे अद्ययावत क्रीडा केंद्र निर्माण होईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. येथे सुरु झालेल्या हिवाळी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
जम्मू आणि कश्मिरचा पायाभूत विकास हाच या तयारीमागचा हेतू असून त्याद्वारे जागतिक स्तरावर एक अत्याधूनिक व अद्ययावत क्रीडा सुविधा केंद्र म्हणून हे केंद्र नावारुपाला येईल. आंतरराष्ट्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी या केंद्राला येत्या काळात जागतिक पसंती मिळेल व त्याद्वारे येथील खेळाडूंनाही मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
गुलमर्गमध्ये या स्पर्धा होत असून येथे तयार करण्यात आलेले क्रीडा सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये सर्व क्रीडा स्पर्धांचे सामने होतील. या स्पर्धेत देशातील 27 राज्यांतील तसेच केंद्र शासित प्रदेशातून खेळाडू सहभागी झाले असून या स्पर्धा येत्या मंगळवारपर्यंत चालणार आहेत.
एक भारत, श्रेष्ठ भारत या घोषणेसह सर्व राज्यांतील खेळाडूंनी संचलनही केले. या स्पर्धांच्या माध्यमातून देशात हिवाळी क्रीडा स्पर्धंची व्याप्तीही वाढेल, असेही मोदी यांनी सांगितले.