राजगुरुनगर : भरोसा सेल”कक्षामुळे कोणत्याही प्रकराच्या हिंसाचारास बळी पडलेल्या महिला व मुलींना अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी मानसिक बळ प्राप्त होईल, असे प्रतिपादन खेडचे आमदार दिलिप मोहिते पाटील यांनी केले. ते राजगुरुनगर येथील खेड पोलिस स्टेशन अंतर्गत “भरोसा सेल” कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
मोहिते म्हणाले, सध्या शहरीकरणामुळे नागरिकांच्या विविध समस्यांना सामोरे जाताना समुपदेशनाची मदत घेण्याची आवश्यकता आहे. या नव्या समस्यांना सामोरे जाताना पोलिसांनी केवळ तांत्रिक बाबीत न जाता समुपदेशनाचा मार्ग स्वीकारावा. समुपदेशनाच्या माध्यमातून नवा सुदृढ समाज घडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे म्हणाले, पतीपासून त्रास असलेल्या महिला, मारहाण, विवाहबाह्यसंबंध, दुसरा विवाह आदी कारणांमुळे सुखी संसारात कडवटपणा’ आल्याचे दिसून येते. याशिवाय एकमेकांवर विश्वास नसल्याने नाते दुरावले आहेत.
हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचारासारख्या प्रकरणात अनेक महिलांना न्याय कुठे मागावा, हेच समजत नाही. त्याचप्रमाणे त्यांचे वेळीच समुपदेशन न झाल्यास संसार रस्त्यावर येतो. हा प्रकार टाळण्यासाठी भरोसा सेलमध्ये दोन्ही बाजूंचे समुपदेशन केले जाणार आहे. या सेलमध्ये पीडित महिलेला विधिविषयक, मानसोपचार, वैद्यकीय मदत एकाच ठिकाणी मिळेल. त्यामुळे हा कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अरविंद चौधरी म्हणाले, “भरोसा सेल” कक्षाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांचे प्रश्न सोडविण्यास निश्चितच मदत होईल. तसेच कौटुंबिक प्रश्न सोडविण्यासाठी या कक्षाची मोठी मदत होईल.
महिला दक्षता कमिटीच्या रेखाताई क्षोत्रिय म्हणाल्या ‘भरोसा कक्ष’ हा सर्वात चांगला आणि उत्तम उपक्रम आहे. या माध्यमातून समाजातील गरजूपर्यंत मदत पोहोचेल.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अरविंद चौधरी, आयपीएस ऑचल दलाल, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले,राज्य पोलिस संघटनचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा माहिते, हुतात्मा राजगुरु महाविद्यालयाचे प्राचार्य एच, एम जरे आदी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस हवालदार संतोष मोरे यांनी केले, तर सुरेखा भोर यांनी आभार मानले.