मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील राजभवन येथे जलभूषण इमारत आणि क्रांतिगाथा या क्रांतिकारकांच्या दालनाचे उद्घाटन केले. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. महाराष्ट्राने देशाला अनेक क्षेत्रात प्रेरणा दिली आहे. जगतगुरू संत तुकाराम महाराजांपासून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत समाजसुधारकांचा अतिशय समृद्ध वारसा महाराष्ट्राला आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रातून संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, संत रामदास आणि संत चोखामेळा यांनी देशाला ऊर्जा दिली आहे. स्वराज्याबद्दल बोलायचे झाल्यास, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना दृढ करते, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले. राजभवनाच्या स्थापत्य रचनेत प्राचीन मूल्ये आणि स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणींचा समावेश केला आहे, असे मत त्यांनी मांडले. राजभवनाचे लोकभवनात रूपांतर करण्याच्या भावनेचीही पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा संबंध आपण जाणतेपणाने किंवा अजाणतेपणाने काही निवडक घटनांपुरता मर्यादित ठेवतो. खरे तर भारताच्या स्वातंत्र्यामध्ये अगणित लोकांची “तपस्या’ होती आणि स्थानिक पातळीवर घडलेल्या अनेक घटनांचा एकत्रित परिणाम राष्ट्रीय पातळीवर दिसत होता. साधने जरी वेगवेगळी असली तरी संकल्प एकच होता. अनाम वीरांच्या योगदानाकडे बराच काळ दुर्लक्ष करण्यात आले, असे पंतप्रधान म्हणाले.
राज्यपालांचे जूने निवासस्थान “जलभूषण’
जलभूषण हे वर्ष 1885 पासून महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान राहिले आहे. जुन्या इमारतीचे आयुष्य संपल्यानंतर ती पाडण्यात आली आणि त्याजागी नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये जुन्या इमारतीचे वैशिष्ट्य असणारे सर्व घटक जतन करण्यात आले. वर्ष 2016 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांना राज भवनाच्या इमारतीमध्ये बंकर सापडला. पूर्वीच्या काळात, ब्रिटीश सैन्यातर्फे शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा साठविण्याची गुप्त जागा म्हणून या बंकरचा वापर केला जात असे. या बंकरचे 2019 साली नूतनीकरण करण्यात आले. महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाच्या स्मरणार्थ या बंकरमध्ये वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचे वस्तुसंग्रहालय म्हणून एक दालन विकसित करण्यात आले. या दालनाच्या माध्यमातून वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, सावरकर बंधू, मादाम भिकाजी कामा, व्ही.बी.गोगटे, 1946 चा नौदलातील उठाव यासह इतर अनेकांच्या योगदानाला श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.