इंदोरी – सुदुंबरे येथील “एनडीआरएफ’च्या पाचव्या “कॉर्प्स कॅम्पस’चे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी (दि. 19) उद्घाटन करण्यात आले. शहा यांनी नवीन कॅम्पसची पाहणी करत माहिती घेतली. यावेळी त्यांनी “एनडीआरएफ’च्या जवानांसोबत स्नेहभोजनही केले.
जवानांशी संवाद साधणे, त्यांच्या देशसेवेच्या विलक्षण भावनेजवळ जाणे आणि त्यांच्यासोबत आनंददायी वेळ घालवणे हे मनाला आनंद आणि अभिमान देते, अशी प्रतिक्रिया अमित शहा यांनी यावेळी दिली. अमित शहा म्हणाले की, मोदी सरकार “एनडीआरएफ’ला अधिक कार्यक्षम करण्यासह उत्तम संसाधन उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे. “एसडीआरएफ’ला एनडीआरएफ’च्या बरोबरीचे बनवण्याची वेळ आली आहे.
लोकांचे प्राण वाचवण्यासाठी “एनडीआरएफ’ जवानांची तत्परता आणि समर्पण यामुळे लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. “एनडीआरएफ’ने आपल्या कर्तव्यदक्षतेने देशातच नव्हे, तर परदेशातही जो विश्वास कमावला आहे, त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी अन्य देशांत जाऊन देखील लोकांचे प्राण वाचवण्यासाठी ते काम करतात. ही परंपरा आपल्याला पुढे चालू ठेवायची आहे’, असे अमित शहा यांनी
स्पष्ट केले.