मुंबई : भाजपा आमदार नितेश राणे सातत्याने शिवसेनेच्या ठाकरे गटावर,खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत असतात. ‘मातोश्री’बद्दल राणे नेहमी आरोप करताना पाहायला मिळतात. नितेश राणे यांनी आज पुन्हा एकदा ‘मातोश्री’वर हल्लाबोल केला आहे. पण यावेळी त्यांनी मातोश्रीवर घडणाऱ्या अनेक घटनांना खासदार संजय राऊत जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच ठाकरेंचे दोन बंधू म्हणजेच आदित्य आणि तेजस ठाकरे यांच्यात मतभेत निर्माण करण्यासाठी राऊत जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे यांनी हे आरोप केले आहेत. त्यांनी “संजय राऊतने युवा सेना प्रमुख पदावरून आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे या दोन भावांमध्ये भांडणं लावली आहेत. महाविकास आघाडीत आदित्य ठाकरेचं प्रस्थ वाढू लागलं आहे. तर शिवसेनेत आदित्य, त्याची नाईट लाईफ गँग आणि वरुण सरदेसाईचा प्रभाव वाढतोय. हे लोक ताकदीने वाढतायत हे संजय राऊतच्या लक्षात आल्यावर त्याने आणि त्याच्या टोळीने आदित्य ठाकरेंविरोधात षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला.असल्याचा आरोप यावेळी केला.
पुढे बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, युवा सेना प्रमुख म्हणून वरुण सरदेसाईचं नाव पुढे येत होतं, पण अचानक ते नाव गायब झालं. वरुण युवा सेना प्रमुख होणार होता. परंतु आदित्य आणि वरुणची ताकद वाढणार मग आमचं काय होणार? आमची दुकानं बंद होणार. या भितीने लगेच तेजस ठाकरेच्या नावाने सामना या मुखपत्रात जाहिराती छापून आणल्या. तेजसचे ठाकरे याचे युवा सेना प्रमुख म्हणून बॅनर छापले. शिवसैनिकांना महाराष्ट्रभर असे बॅनर लावायला सांगितलं. त्यामुळे या दोन्ही भावांमध्ये (आदित्य आणि तेजस) भांडणं लागली.
“आम्ही असं ऐकलंय की युवा सेना प्रमुख पदावरून तेव्हा मातोश्रीवर दोन्ही भावांमध्ये भांडणं सुरू झाली. त्यामुळे काही वेळासाठी तेजस ठाकरे कर्जतच्या फार्म हाऊसवर राहायला गेला. हा संजय राऊत ज्या मालकाचं मीठ खातो, पगार घेतो त्याच्याच घरात आग लावण्याचं काम करतो. संजय राऊत मोठा काटा आहे, तो मोठा आगलाव्या आहे,” असे म्हणत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.