कोलकाता – कोलकात्यात हिंसाचारामुळे सहाव्या टप्प्यातील मतदानाला गालबोट लागले. भाजपच्या उमेदवार भारती घोष यांच्यावर स्थानिक नागरिकांकडून दोन वेळेस हल्ला झाला. घाटलाल लोकसभा मतदारसंघामधील मतदान केंद्रांना भेट द्यायला गेल्या असताना माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दोनवेळेस हल्ला झाला. यापैकी एकावेळी झालेल्या दगडफेकीमध्ये घोष यांचा सुरक्षा रक्षक जखमी झाला. या प्रकरणाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून पश्चिम मिदनापूर जिल्हा दंदाधिकाऱ्यांकडून याबाबत अहवाल मागवण्यात आला आहे. या सर्व घटनाक्रमामध्ये भारती घोष या किरकोळ जखमी झाल्या आहेत.
सकाळी केशपूर येथील मतदान केंद्रामध्ये भाजपच्या निवडणूक प्रतिनिधीला घेऊन जात असताना त्यांच्यावर स्थानिक महिलांनी हल्ला केला. त्यानंतर काही गैरव्यवहार झाल्याची तक्रार समजल्यावर दोगाचिया येथील मतदान केंद्राकडे जात असताना त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर बॉम्ब फेकले गेले आणि दगडफेकही झाली. यामध्ये घोष यांचा सुरक्षा रक्षक जखमी झाला. घोष यांच्या वाहनाचेही नुकसान झाले. जमावाला नियंत्रित करण्यासाठी सुरक्षा रक्षकांना लाठीमार करावा लागला.
यावेळी केंद्रीय सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात तृणमूल कॉंग्रेसचा एक कार्यकर्ताही जखमी झाल्याचे म्हटले गेले. मात्र सीआरपीएफने गोळीबार केल्याचा दावा फेटाळला आहे. तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. आपल्या सुरक्षा रक्षकाने गोळीबार केल्याचा आरोप खोटा आहे, असे भारती घोष यांनी म्हटले आहे.
भारती घोष निवडणूक केंद्रामध्ये व्हिडीओग्राफी करत असल्याचीही तक्रार आली असून राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबतही अहवाल मागवला आहे. भाजप आणि तृणमूल कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर हिंसाचाराचे आरोप केले आहेत.
घोष पोलिस अधिकारी असतानाची प्रतिमा खराब आहे. त्या कायदा मोडण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यामुळेच लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला, असे घटालचे तृणमूलचे खासदार दीपक अधिकारी यांनी म्हटले आहे. मात्र भारती घोष यांच्यावर पहिल्यांदाच हल्ला झालेला नाही. घोष यांना राजकारणात येण्यापासून रोखू न शकल्यानेच त्यांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न तृणमूल कॉंग्रेस करत असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे.