मुंबई – उत्तर प्रदेशात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. ही विधानसभा निवडणूक 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट समजली जाते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी संपूर्ण जोर लावला आहे. मात्र उत्तर प्रदेशातील भाजप सरकारसाठी ही निवडणूक खडतर ठरणार अशी चिन्हे असून एका कॅबिनेटमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता भाजपला गळती लागणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मोठ भाकीत केलं आहे.
योगी आदित्यनाथ सरकारमधील कॅबिनेटमंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिला आहे. हाच धागा पकडून शरद पवार यांनी मोठं भाकीत केलं आहे. उत्तर प्रदेशात आगामी काळात 13 आमदार भाजपमधून बाहेर पडणार असल्याचं म्हटलं. तसेच हे आमदार समाजवादी पक्षात प्रवेश करणार असून तिथं मोठा बदल घडून येईल, असा दावाही शरद पवार यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, आपण समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांचा प्रचार करण्यासाठी आपण उत्तर प्रदेशात जाणार आहे. खुद्द अखिलेश यादव यांनी आपल्याला प्रचारासाठी आग्रह केला आहे. त्यामुळे माझ्यासह काहीजण उत्तर प्रदेशात प्रचारासाठी जाणार आहेत.
13 MLAs are going to join Samajwadi Party (SP): NCP chief Sharad Pawar on Uttar Pradesh minister Swami Prasad Maury resigning and joining SP pic.twitter.com/ZZJnAQRvba
— ANI (@ANI) January 11, 2022
यावेळी पवार यांनी योगींनी केलेल्या 80 टक्के आणि 20 टक्के या विधानाचा समाचार घेतला. राज्याचा प्रमुख हा सर्वांचा असतो. योगींचं विधान हे देशातील अल्पसंख्यांकांना छेद देणार आहे. मुख्यमंत्रीपदाला असं विधान शोभा देत नाही. उत्तर प्रदेशातील जनता याला प्रत्युत्तर देईल, असंही शरद पवार यांनी नमूद केलं.