रायगड – करोनाचे आरोग्याबरोबरच आता सामाजिक परीणाम दिसून येण्यास सुरूवात झाली आहे. रायगड जिल्ह्यात करोनामुळे तब्बल 328 मुलांवरील मायेचे छत्र हरपले आहे. यातील 14 मुलांनी आई आणि वडील दोघांनाही पोरकी झाली आहे.
राज्यातील इतर भागांप्रमाणे रायगड जिल्ह्यातही करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाण झाला. गेल्या दिड वर्षात जिल्ह्यातील 1 लाख 48 हजार 305 जणांना करोनाची लागण झाली. यातील 3 हजार 620 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे अनेक कुटूंब उद्ध्वस्त झाली. घरातील कमविता व्यक्ती अनेकांनी गमावली.
करोनामुळे रायगड जिल्ह्यातील 328 मुलांचे मायेचे छत्र हिरावले गेले आहे. यातील 14 मुलांनी तर करोनामुळे आपल्या आई आणि वडीलांना गमावले आहे. तर 314 मुलांच्या आई अथवा वडीलांचे करोनामुळे निधन झाले आहे.