माझ्याविरोधात जातीच्या राजकारणाचा रंग देण्याचा प्रयत्न : चंद्रकांत पाटील
पुणे/कोथरूड -“केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेनुसार मी कोथरूड मतदारसंघात उमेदवार म्हणून आलो आहे. मला हा निर्णय सुरुवातीला स्वीकारणं अवघड होतं; पण नेत्याची इच्छा ही आज्ञा मानून काम करणारा मी कार्यकर्ता असल्याने ही निवडणूक लढवत आहे’, असे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजप-सेना महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी स्पष्ट केले.
प्रचारार्थ आयोजित पहिल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट, महापौर व कसबा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार मुक्ता टिळक, पर्वती मतदारसंघाच्या उमेदवार माधुरी मिसाळ, माजी मंत्री शशिकांत सुतार, खासदार संजय काकडे, योगेश गोगावले, मेधा कुलकर्णी, मुरलीधर मोहोळ तसेच भाजपचे कोथरूडमधील नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. “माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराजीचा सूर उमटण्यास सुरुवात झाली, त्याला जातीच्या राजकारणाचा रंग देत वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. माझ्यावर टॉक शो सुरू झाले पण, या मेळाव्याने सगळं संपलं आहे असं मला वाटतं. लढलो तर मला हरणे माहीत नाही. राज्याच्या राजकारणात आमच्याविरोधात विरोधकांनी गणपती पाण्यात ठेवले होते. पण त्यांना ते लाभत नाही, असेही पाटील यांनी सांगितले. पुण्यातले प्रश्न मला माहीत आहेत, ते सोडवण्यासाठी मी सतत प्रयत्न करीत राहीन. विरोधकांकडे मुद्देच नाहीत, आमच्या सभा सुरू झाल्यावर तर विरोधक टिकणार नाहीत. आम्ही संतुष्ट नाही जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतो. या मतदारसंघातून भाजप-सेनेच्या उमेदवाराला नेहमीच मताधिक्य मिळते हे मला माहीत आहे, तरी पण मी या मतदारसंघात प्रचारासाठी खूप वेळ देणार आहे. प्रचाराचे नियोजन झाले आहे’, असेही त्यांनी सांगितले.
बापट म्हणाले, “कार्यकर्ता म्हणून चंद्रकांत पाटील यांचे काम मोठं आहे. ते साधे आहेत, सामान्य कार्यकर्त्यात मिसळणारा माणूस अशी त्यांची ओळख आहे. हा रडणारा दादा नसून लढणारा दादा आहे. त्यांना कोथरूडमधून मोठं मताधिक्य द्यायचे आहे. त्यांना पुण्यातील प्रश्न माहीत आहेत आणि या अगोदरही ते सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत’.
मी पक्षाशी एकनिष्ठ : कुलकर्णी
कोथरूड भागाचे आजवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली आता पक्षाने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ही संधी दिली आहे. त्यांच्याकडून सुद्धा भविष्यात कोथरूडचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत आमदार मेधा कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी पाठीत खंजीर खुपसला तरी चालेल तरी पण मी पक्षाशी एकनिष्ठ राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कुलकर्णी म्हणाल्या, या निवडणुकीत माझ्याकडे पक्षाकडून जी जबाबदारी सोपविण्यात येईल, ती मी पार पाडणार. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील हे राज्यातील एकमेव उमेदवार असतील जे सर्वाधिक मतांनी निवडून येतील, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपचे नगरसेवक मुरली मोहोळ हेसुद्धा यावेळी उपस्थित होते. त्यांनी सुद्धा आपण पाटील यांच्या प्रचंड बहुमतांनी विजयी करून, असा विश्वास व्यक्त केला.