शिवसेनेच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचे उत्तर
मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सत्तेमध्ये 50-50 चा फॉर्म्युला मिळावा अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनेच्या मागणीला उत्तर देत महायुतीत भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षे भाजपच्या नेतृत्वाखालीच राज्यात महायुतीचे सरकार काम करेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्अ केले आहे.
Maharashtra CM Devendra Fadnavis: We have emerged as the largest party in the alliance in the state. We will give a stable govt of ‘Yuti’ (alliance) for the next 5 years in the leadership of Bharatiya Janata Party (BJP). #Maharashtra pic.twitter.com/GXsLmiMYQO
— ANI (@ANI) October 26, 2019
राज्यामध्ये आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. यासंदर्भात मातोश्रीवर शनिवारी शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. या बैठकीमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपशी वाटाघाटी करण्याचे सर्व अधिकार उध्दव ठाकरे यांना देण्याचा निर्णय सर्व आमदारांनी एकमताने घेतला.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने समसमान जागावाटप आणि सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला होता. त्या प्रमाणेच आता शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिले जावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री पद हे भाजपकडेच राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. ‘राज्यात आम्ही पुन्हा एकदा स्थिर सरकार देणार असून युतीचे हे सरकार 5 वर्षे भाजपच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे, असे सांगून फडणवीस यांनी 5 वर्षे मुख्यमंत्रिपद भाजपकडेच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.