मातीच्या बैलजोडीवर भाद्रपदी पोळा साजरा करण्याची वेळ
चिंबळी – शेतकरी बांधवांसोबत वर्षभर शेतात राबणाऱ्या लाडक्या सर्जा-राजाचा भाद्रपदी बैलपोळा हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, गेल्या सहा ते सात वर्षांपासून बैलगाडा शर्यत बंद असल्यामुळे आणि शेतकरीही अत्याधुनिक सामुग्रीचा वापर करीत असल्याने शेतकऱ्यांनी बैल पाळणे बंद केल्याने गेल्या दोन-तीन वर्षांपासून खेड तालुक्याच्या दक्षिण भागात मातीच्या बैलांना मागणी वाढली असल्याने कुंभारवाड्यात मातीच्या बैलजोडी तयार करून त्यांच्या रंगरंगोटीच्या कामाला वेग आला आहे.
शेतामध्ये पूर्वी जी कामे करण्यासाठी बैलांचा उपयोग होत होता, त्यापैकी आता बहुतांश कामे ट्रॅक्टर किंवा आधुनिक यंत्राचा वापर अन् बैलगाडी शर्यती बंद असल्याने बैलांचे महत्त्व कमी झाले आहे. बैलांची संख्या कमी झाली असली तरी अनेक अडचणी भासतात. परंतु आजही ग्रामीण भागात परंपरा म्हणून पोळा सण उत्साहात साजरा करण्यात येत असला तरी आता तो मातीच्या बैलांची पूजा करून पोळा साजरा करण्याची प्रथा रुढ झाली आहे. भाद्रपदी पोळा शनिवारी (दि. 28) असल्याने दक्षिण भागातील कुरुळी, मरकळ येथील कुंभार वाड्यात मातीचे बैल बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून एका बैल जोडीचे किमंत 101 ते 2 हजारापर्यंत किंमती ठेवण्यात कारागिर लालू जगताप व शुभांगी कुंभार यांनी सांगितले.