मुंबई – करोनाच्या दुसऱ्या लाटेतही अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. या संबंधात एक सर्व्हे करून या नोकरकपातीची सर्वाधिक फटका कोणाला बसला याची पाहणी करण्यात आली असता, कोविडच्या दुसऱ्या लाटेत 55 वर्षांवरील सहा टक्के लोकांना कायमच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.
तथापि, 24 वर्षांखालील तब्बल 11 टक्के लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत असे दिसून आले आहे. एप्रिल महिन्यात दोन हजार लोकांच्या मुलाखती घेऊन ही माहिती जमवण्यात आली.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेने मे महिन्यात जो अहवाल सादर केला आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे की करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील सुमारे एक कोटी लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. या काळात बेरोजगारीचा दर 12 टक्क्यांच्या पातळीवर गेला आहे.
ज्यांना कायमस्वरूपी नोकऱ्या होत्या, त्यांचेही यात मोठे नुकसान झाले आहे. दुसऱ्या लाटेत देशाचा जीडीपी उणे सातवर गेला आहे. विकासदर मंदावल्याचा परिणाम फ्रॉडच्या केसेस वाढण्यातही झाला असल्याचे यातून दिसून आले आहे.
18 ते 24 वयोगटातील लोकांकडून जी माहिती घेण्यात आली, त्यातील 38 टक्के लोकांनी या काळात फ्रॉडचे प्रमाण वाढल्याचे नमूद केले आहे, तर 25 ते 29 वयोगटातील 41 टक्के लोकांनी आपल्याला वाढलेल्या फ्रॉडचा अनुभव आल्याचे या मुलाखतींमध्ये नोंदवले आहे.