लोकसभा निवडणूक : दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४६.६३ टक्के मतदान
लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु झाले आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात १० मतदारसंघात मतदान होत आहे. यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या मतदारसंघाचा समावेश आहे.
दुसऱ्या टप्प्यात राज्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. परंतु, मतदानावेळी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान केंद्रावर मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. भोकर, नायगाव, मुखेड, नांदेड उत्तर आणि दक्षिण, देगलूर या ठिकाणी एकूण ७८ मशीन बंद पडल्या. त्यानंतर प्रशासनाने या मशीन्स बदलल्या आहेत. मतदान केंद्रावरील मतदारांनी वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी २१.४७ टक्के मतदान झाले. त्यानंतर १ वाजेपर्यंत सरासरी ३५.४० टक्के मतदान, आणि आता ३ वाजेपर्यंत सरासरी ४६.६३ टक्के मतदान झाले.