मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची बैठक; शासनाला निवेदन देणार
पुणे – मराठा समाज आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून योग्य प्रयत्न केले जात नाहीत. समाजाच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्या मान्य करा, अन्यथा 9 ऑगस्टपासून मराठा समाज राज्यव्यापी आंदोलन सुरू करेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे देण्यात आला आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची ऑनलाइन बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली. प्रलंबित मागण्यांचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला. यावेळी वीरेंद्र पवार, विनोद पाटील, राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव, दिलीप पाटील, विनोद साबळे, अंकुश कदम, करण गायकर, माउली पवार व इतर विविध जिल्ह्यांतील प्रमुख समन्वयकांची उपस्थिती होती. समाजाच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारला पुन्हा निवेदन देण्यात येणार आहे.
समाजाने मांडलेल्यांमध्ये प्रामुख्याने कोपर्डीच्या भगिनीला न्याय, सारथी संस्था, मराठा आरक्षणाबाबत दि. 7 जुलै रोजी होणाऱ्या कोर्ट सुनावणीत राज्य सरकारची भूमिका, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मराठा आंदोलनामधील गुन्हे मागे घेणे, बंद पडलेली मराठा विद्यार्थ्यांची वसतिगृह पुन्हा सुरू करणे अशा विविध मागण्यांचा समावेश आहे.