सातारा -सातारा शहर कार्यकारिणीचे तब्बल दहा पदाधिकारी राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असून त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्धार केल्याची खात्रीशीर माहिती आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या पवित्र्यामुळे शहर कार्यकारणीमध्ये खळबळ उडाली असून या कार्यकारणीचे डॅमेज कंट्रोल नक्की कोण करणार? याविषयी संभ्रमावस्था आहे.
राज्यात नाट्यमय घडामोडींनंतर सत्तापालट होऊन शिंदे गट आणि भाजप युतीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साताऱ्यातील कट्टर समर्थक नीलेश मोरे यांना शिवसेनेने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मात्र शिंदे गटाने आपलीच शिवसेना मूळ असल्याचा दावा केल्याने शिंदे समर्थक गट आणि उद्धव ठाकरे समर्थक गट अशा दोन गटांमध्ये कार्यकर्ते विभागले गेल्याने संभ्रमावस्था वाढली आहे. तशातच सातारा शहर कार्यकारणीमध्येसुद्धा प्रचंड अस्वस्थता आहे.
सातारा शहर संघटक अमर इंगोले, उपशहरप्रमुख अभिजीत सपकाळ, उपशहरप्रमुख सयाजी शिंदे, विभाग प्रमुख अमोल खुडे, उपविभाग प्रमुख म्हणून मनोज भोसले, शाखा क्रमांक एक पंतचा गोट येथील शाखाप्रमुख अमोल पवार, उपशाखाप्रमुख प्रथमेश बाबर, बुथ प्रमुख आसीफ फकीर, प्रभाग क्रमांक पाचमधील विभाग प्रमुख सुमित नाईक या दहा कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा राजीनामा देऊन शिंदे गटाला समर्थन देण्याची तयारी चालवली आहे. त्यामुळे सातारा शहर कार्यकारणीमध्ये खळबळ उडाली आहे. या कार्यकारणीचे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याची सध्याची परिस्थिती आहे.
सातारा विधानसभा मतदार संघाचे जिल्हाध्यक्ष यशवंत घाडगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, युवा मोर्चाचे संघटन रणजित भोसले यांच्याकडे आहे. त्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालायला हवे. शिवसेनेच्या वरिष्ठ कार्यकारणी तुम्ही असल्यामुळे माझा त्या प्रकरणाची थेट संबंध येत नाही.
यासंदर्भात मुख्यमंत्री गटाचे कट्टर समर्थक नीलेश मोरे म्हणाले, साताऱ्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही, जिल्हा कार्यकारणीचे आणि शहर कार्यकारणीमध्ये कधीही वितंडवाद नव्हता, मात्र तरीही शहर कार्यकारणीच्या सदस्यांना कधीही बळ दिले जात नव्हते, त्यामुळे कदाचित त्यांनी राजीनाम्याचा पवित्रा घेतला असेल, हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय चा भाग आहे पण त्यांची येण्याची इच्छा असेल तर त्यांचे शिवसेनेत स्वागतच आहे आम्ही कोणीही शिंदे गट किंवा उद्धव ठाकरे गट असा कोणताही गट मानत नाही, आजही शिवसेना अभंग आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेचे वाटचाल आणि सातारा जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न सोडवण्याचे काम आहोरात्र सुरूच राहील असे नीलेश मोरे यांनी स्पष्ट केले.