मुंबई – भ्रष्टाचार हे देशाच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम करणारे सर्वात मोठे संकट असल्याचे मत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. अशा भ्रष्टाचाराला देशातून हद्दपार करण्याठी सरकार, समाज आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
नवी दिल्ली येथील नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) कार्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आज उपराष्ट्रपतींच्या हस्ते झाले, त्यानंतर ते बोलत होते.
माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या वचनांचे स्मरण करत उपराष्ट्रपती म्हणाले की, पालकांबरोबरच शिक्षकही विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडविण्यात आणि मूल्याधारित समाजाची निर्मिती करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
डॉ. आंबेडकर यांना मन:पूर्वक आदरांजली अर्पण करत उपराष्ट्रपती म्हणाले की, त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. ते प्रतिभावंत – दूरदर्शी राजकारणी, तत्त्वज्ञ, बुद्धिवंत, प्रख्यात न्यायविद्, अर्थशास्त्रज्ञ, लेखक आणि समाजसुधारक होते त्याचबरोबर सहृदय मानवतावादी होते.
आपली राज्यघटना हा एक पवित्र ग्रंथ असून त्याने आतापर्यंत सर्वच बाबींवर मार्गदर्शन केले आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या राज्यघटनेचे पावित्र्य कायम राखले पाहिजे आणि त्या पावित्र्याचा कधीही भंग होऊ नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.