पुणे – येत्या 15 दिवसांत महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात 2 मोठे राजकिय भूकंप होणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील कथित बंडांच्या वावड्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राजकारण अगोदरच तापले आहे. त्यातच आंबेडकरांनी हा दावा केल्यामुळे विविध तर्कवितर्कांना उधान आले आहे.
आंबडेकर पुणे श्रमिक पत्रकार संघात एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी आले होते. ते माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, येत्या 15 दिवसांमध्ये महाराष्ट्रात बरेच मोठे राजकारण होईल. त्यामुळे आपण पंधरा दिवसांची आपण वाट पाहूया. देशात, राज्यात दोन मोठे राजकीय भूकंप होतील. त्यांच्या या सूचक विधानामुळे वेगवेगळ्या राजकीय अटकळी व्यक्त केल्या जात आहेत. तसेच यावेळी “राज्य सरकार महाराष्ट्र भूषण हा सन्मान देते हा त्यांचा अधिकार आहे, त्यांची जात काढू नये,’ असेही त्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कारावर टिप्पणी करताना म्हटले.
सरकारला राजकारण करायचे होते
आंबेडकर बोलताना पुढे म्हणाले, सत्यपाल मलिक आत्ता बोलले आहेत पण हे सगळे मी त्यावेळीच बोललो होतो. जी गाडी ब्लास्ट झाली, त्याला सुरक्षा नव्हती. ही माहिती मला मिळू शकते तर ती सरकारलाही मिळू शकते. पण, सरकारला राजकारण करायचे होते. एकीकडे गुन्हेगारांना कायद्याने आळा घालायचा नाही आणि दुसरीकडे त्यांना गोळ्या घालण्याचा प्रकार सुरू आहे. पूर्वी डकेतीला समाज नव्हता, आता तो आपल्या समाजाचा नाही म्हणून त्यांना मारायचे, हाच प्रकार सुरू आहे, अतिक व अश्रफ अहमद एन्काऊंटर वर बोलताना आंबेडकरांनी म्हटले.