नाशिक – राज्यातील काही भाग पिंजून काढल्यानंतर आज नाशिक मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जाहीर सभा सूर आहे. राज ठाकरे आपल्या आक्रमक भाषणातून अमित शाह आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत आहेत. ही लोकसभा निवडणूक यावेळेस राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे.
दरम्यान,वर्षाला २ कोटी लोकांना रोजगार मोदी देणार होते त्याचं काय झालं? मेक इन इंडियाचं काय झालं? स्टार्ट अप इंडियाचं काय झालं?नोटबंदी कोणालाही विश्वासात न घेता का लादली? ह्या नोटबंदीच्या रांगेत अनेक माणसं गेली, ४.५ ते ५ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. ह्यावर मोदी कधी बोलणार? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. या सरकारच्या काळात १४००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे
- सत्तेत बसलेल्या पक्षाने निवडणुकीच्या आधी दिलेली आश्वासनं पूर्ण करायची असतात, पण जर तुम्हाला दिलेली आश्वासनं पूर्ण होणार नसतील तर मग तुम्ही का मतदान का करायचं? चांगलं शिक्षण, नोकरी, चांगले रस्ते, वीज, पाणी, मैदानं ह्यापलीकडे लोकांना काय हवं असतं?
- नाशिकमध्ये आम्ही सत्तेत असताना आमच्या जाहीरनाम्यात ज्या गोष्टी सांगितल्या नव्हत्या त्यादेखील करून दाखवल्या. नाशिक हे देशातील एकमेव शहर असेल जिथे उद्योगपतींनी सीएसआरमधून पैसे खर्च करून अनेक प्रकल्प उभारायला मदत केली आणि ते देखील फक्त ५ वर्षात.
- नाशिकच्या ५ वर्षाच्या सत्ताकाळात आम्ही ५१० किमीचे अंतर्गत रस्ते बांधले,वाहतूक बेटं,चिल्ड्रेन ट्रॅफिक एज्युकेशन पार्क, गोदा पार्क, बोटॅनिकल गार्डन, मा.बाळासाहेब ठाकरे स्मारक, घनकचरा प्रकल्प,जलशुद्धीकरण प्रकल्प,मलजल प्रक्रिया केंद्र, मुकणे धरणातून थेट पाईपलाईन योजना, प्रकल्प राबवले
- नाशिकमध्ये नरेंद्र मोदींनी येऊन कांदा उत्पादकांना भाव देऊ असं सांगितलं, देवेंद्र फडणवीस २ वर्षांपूर्वी म्हणाले की आम्ही १२०००० विहिरी बांधल्या. तरीही २८,००० गावं आज दुष्काळग्रस्त आहेत.नाशिकच्या जवळच्या तालुक्यातील गावात जीवावर बेतून पाणी भरत आहेत. काय झालं त्या विहिरींचं?
- आधीच्या सरकारच्या काळात मीच तेंव्हाच्या सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत होते. त्यावेळी सिंचन घोटाळ्यातील भ्रष्टाचारावर भाजपचे नेते घसा फोडून ओरडत होते. पण सत्तेत आल्यावर देवेंद्र फडणवीसांनी ज्यांच्यावर आरोप होते ते सुनील तटकरे आणि अजित पवारांवर का नाही कारवाई झाली?
- अमित शाह सांगलीत म्हणाले होते की ७२००० कोटींच्या घोटाळ्याचं काय झालं? तुम्ही सत्तेत होतात उत्तरं द्या? भाजप-शिवसेनेच्या सत्तेच्या काळात जलसिंचनाची नक्की काय कामं केली? हे कधी ते सांगणार आहेत?
- नरेंद्र मोदी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस म्हणाले होते की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी आश्वासनांच्या पलीकडे काय दिलं? कांदा एक रुपये किलोवर येऊन थांबतो अशा वेळेस शेतकऱ्यांनी कसं जगायचं?दत्तक घेतो म्हणणारे मुख्यमंत्री पळून जातात.
- भाजप सेनेच्या सत्ताकाळात १४००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचं भांडवल करून हे सत्तेत आले आणि ह्याच शेतकऱ्यांविषयी भाजपचे नेते वाट्टेल ती विधानं करत होते. ह्यात केंद्रीय कृषीमंत्र्यांपासून ते राज्यातील नेत्यांपर्यंत सगळे आहेत.हा सत्तेचा माज आहे.
- नोटबंदी आणि जीएसटीमुळे साडेचार ते ५ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. रोजगार द्यायला सत्तेत येणार असं म्हणाला होतात ना? पण तुमच्याच काळात एका पंतप्रधानांच्या लहरी निर्णयामुळे इतका मोठा रोजगार बुडाला. आणि ह्या बेरोजगारीचे आकडे तुमच्यासमोर येऊन दिले जात नाहीत.
- कपिल सिब्बल नोटबंदीवर एक पत्रकार परिषदघेतली होती,ते म्हणाले,नोटबंदीच्या अगोदर उर्जित पटेल ह्यांच्या सहीने २००० हजाराच्या नोटा छापून एअरफोर्सच्या विमाननाने भारतात आणल्या, आरबीआय रॉच्या काही अधिकाऱ्यांच्या सहाय्याने काही खाजगी लोकांच्या ३ लाख कोटींच्या जुन्या नोटा बदलून दिल्या.
- एचएएलच्या कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला त्यांना हजार कोटींचं कर्ज काढावं लागलं, एचएएल कंपनी सक्षम असताना कुठलाही अनुभव नसलेल्या अनिल अंबानींच्या कंपनीला राफेल विमानांच काम दिलं गेलं, पण एचएएल का नाकारलं गेलं?
- २०१६ नंतर देशात बलात्कारांचे गुन्हे किती झाले, बेरोजगारीचं प्रमाण काय आहे ह्याचे आकडे बाहेर येऊ दिले जात नाहीयेत. माध्यमांना दाबून टाकलंय, खऱ्या गोष्टी बाहेर येऊ दिल्या जात नाहीयेत.
- मला ५० दिवस द्या, नोटबंदी फसली तर मला देशातल्या कुठल्याही चौकात उभं करा आणि हवी शिक्षा द्या असं मोदी म्हणाले होते. नोटबंदी पूर्णपणे फसली. आता मोदींनी सांगावं त्यांना कुठल्या चौकात शिक्षा द्यायची ते?
- नरेंद्र मोदींनी जी जी स्वप्न दाखवली त्यावर मोदी काही बोलायला तयार नाहीयेत. आणि ५ वर्षानंतर मोदी मतं मागत आहेत पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या जीवावर, बालाकोटमध्ये एअरस्ट्राईक करणाऱ्या वैमानिकांच्या जीवावर
- देशाबाहेरचा काळा पैसा देशात आणण्यासाठी टास्कफोर्स तयार करू, जो काळा पैसा भारतात आणू, त्यातून नोकरदार वर्गाला त्यांच्या प्रामाणिकतेबद्दल काही पैसे परत करू असं मोदी म्हणाले होते. पुढे सत्तेत आल्यावर अमित शाह म्हणाले की १५ लाख खात्यात जमा करू हा चुनावी जुमला आहे. देशाला मूर्ख बनवतात
- २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजपचे नेते, रॉबर्ट वाड्रा हे भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांना जेल मध्ये टाकू असं म्हणाले होते. पण सत्तेत आल्यावर अमित शाह म्हणाले की रॉबर्ट वाड्रा ह्यांना जेलमध्ये टाकू असं कधीच बोललो नव्हतो.
- मध्यंतरी नरेंद्र मोदींनी एक नवीन कार्ड काढलं की मी खालच्या जातीतील आहे म्हणून माझ्यावर आरोप होत आहेत. आम्ही जे प्रश्न विचारत आहोत त्याचा कोणाच्या जातीशी काय संबंध?
- नरेंद्र मोदी गोरक्षाच्या नावाखाली दलित तरुणांना उना मध्ये बेदम मारहाण झाली, त्या तरुणांनी गाय मारली नव्हती तर मृत गायीचं कातडं काढायला लोकांनी बोलावलं म्हणून ते तरुण गेले.त्या तरुणांचा काय दोष होता? गोरक्षाच्या नावाखाली ४०,५० लोकं मारली गेली, त्यावर आपण कधी का नाही बोललात?
- हे लोकं तुम्हाला जातीत-आरक्षणात गुंतवणार, आरक्षणातून नोकऱ्या मिळतील अशी खोटी स्वप्न दाखवायची, मुळात सरकारी नोकऱ्या राहिल्यात किती? पण तरीही तुम्हाला ह्यातच गुंतवायचं, तुम्हाला वापरतील, मतदान झालं की तुम्हाला विसरून जातील इतकी नीच माणसं आहेत ही.
- अटलजींनी कधीही कारगिल युद्धाचं राजकारण केलं नाही पण इथे मोदी बालाकोट एअरस्ट्राइक करणाऱ्या वैमानिकांच्या शौर्यावर मतं मागत आहेत. मोदी नवमतदारांना आवाहन करत आहेत की तुमचं पहिलं मत पुलवामा शहीदांसाठी आणि बालाकोटच्या वैमानिकांसाठी द्या. लाज नाही वाटत पंतप्रधानांना?
- व्यापारी हा सैनिकांपेक्षा अधिक शूर असतो असं मोदी म्हणाले होते. ही जवानांबद्दलची पंतप्रधानांना आस्था. प्रग्या ठाकूर म्हणाल्या की शहीद हेमंत करकरे, माझ्या शापाने ही लोकं गेली.अशा बाईंना तुम्ही लोकसभेचं भोपाळमधून तिकिट देतो इतकंच नव्हे तर त्यांच्या विधानाचं समर्थन मोदी-शाह करत आहेत
- सीबीआय, आरबीआय, सुप्रीम कोर्ट सारख्या स्वायत्त संस्थांवर नरेंद्र मोदी सरकारने पूर्ण अंकुश आणला आहे. जे हिटलर करत होता तेच मोदी करत होता. हिटलर तेंव्हा सिनेमे बनवत होता आणि इथेपण सुरू आहे ‘पॅडमॅन’, टॉयलेट एक प्रेम कथा असे सिनेमे निघत आहेत.
- मोदी-शाह ह्या जोडीने तुम्हाला गृहीत धरलं आहे. ही निवडणूक ह्या देशात लोकशाही टिकणार आणि हुकूमशाही येणार हे ठरवणारी निवडणूक आहे हे विसरू नका. मोदी-शाह ह्यांना राजकीय क्षितिजावरून हटवण्यासाठीची ही निवडणूक आहे हे विसरू नका आणि ह्यांच्या ढुंगणावर लाथ मारून हाकलून द्या