भोर (वार्ताहर) – बाजारवाडीच्या मानकरवाडीतील करोना बाधितांच्या कुटुंबातील आई, वडील व आजी अशा तीन व आळंदे येथील एक अशा एकूण चार जणांचे स्वॅब पुणे येथे तपासणीसाठी पाठवले होते. त्या चारही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे भोरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तर धांगवडी येथील 76 व खोपी येथील 36 जणांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले आहे.
आमदार संग्राम थोपटे यांनी मंगळवारी (दि.26) भोर तालुका पंचायत समितीच्या सभागृहात करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली होती. मात्र, या बैठकीला प्रसिद्धी माध्यमांना दूर ठेवल्याने या बैठकीत नेमके काय ठरलं या माहितीपासून जनता दूर राहिली असल्याने याबाबत भोरमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
त्यातच तालुक्यात डझनभर करोना बाधितांचा आकडा समोर आल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. या विषयाच्या अनुषंगाने प्रशासकीय अधिकाऱ्यांची गुरुवारी (दि. 29) तातडीची बैठक होऊ न करोनाचा प्रसार रोखण्यासाठी भोर शहराच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ग्रामदूत आणि शहर दुतांशिवाय कोणासही शहरात प्रवेश दिला जाणार नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शनिवारी (दि.30) भोर शहरात हजारो नागरिक खरेदीच्या नावाखाली कसे काय प्रवेश करु शकले? हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे.