मुज्जफरनगर – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यांमध्ये एनडीएच्याच बाजूने कौल मिळाला असून विरोधकांचे संसदेतील अस्तित्व नेमक किती असेल ते उर्वरीत तीन टप्प्यांमधून स्पष्ट होईल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आज येथील एका प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले की आपल्या सरकारने दहशतवादाच्या विरोधात निकराची लढाई केली पण हा धोका अजून पुर्ण संपलेला नाही कारण अलिकडेच श्रीलंकेत अनेक साखळी स्फोट झाले आहेत असे ते म्हणाले.
दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या भूमिका घेऊन त्यांच्या फॅक्टऱ्या चालवणाऱ्यांनी या विषयावर चौकीदाराला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे असे ते म्हणाले. राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका करताना ते म्हणाले की काहीं लोक सध्या जामीन मिळवण्यासाठी कोर्टाच्या फेऱ्या करीत आहेत. हे लोक दिल्लीत पुन्हा सक्षम सरकार येईल की काय या भीतीखाली आहेत. सध्या विरोधक विजयासाठी नव्हे तर त्यांच्या अस्तित्वासाठीच लढत देत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.
विरोधकांना पुन्हा संधी मिळाली तर बिहार मध्ये पुन्हा जंगलराज निर्माण होईल आणि आपल्या मुली या राज्यात सुरक्षित राहु शकणार नाहींत त्यांना सायंकाळी घरीच थांबून राहावे लागेल असेही मोदी यांनी यावेळी नमूद केले.