नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी रविवारी भारताने या ७५ वर्षांत म्हणावी तेवढी प्रगती केली नाही, असे मत व्यक्त केले. नवी दिल्लीत एका सभेला संबोधित करताना मोहन भागवत यांनी यावेळी आपले मत मांडले. “या 75 वर्षात आपण जितकी प्रगती करू शकलो असतो तितकी प्रगती केली नाही. कारण आपण प्रगतीचा जो मार्ग निवडला तो योग्य नव्हता.”
“भारतातील लोकांनी या भूमीला प्राचीन काळापासून आपली मातृभूमी मानली आहे. जर आपण असेच करत राहिलो आणि भाऊ-बहिणी म्हणून एकत्र काम केले तर भारताची प्रगती कोणीच रोखू शकत नाही”, असे त्यांनी यावेळी म्हटले.
“आपल्या संस्कृतीचे एक अंगभूत सामर्थ्य आहे म्हणूनच आपण टिकून राहिलो आहोत. आपण ३००० किमी लांबीच्या प्रदेशात १३० कोटी लोकसंख्येचे राष्ट्र आहोत. प्राचीन ग्रीस आणि रोमच्या संस्कृती नष्ट झाल्या पण भारतीय संस्कृती टिकून राहिली आहे. आपल्याकडे एक आदर्श आहे: जगाला शिक्षित करण्यासाठी, जिंकण्यासाठी नाही,” भागवत म्हणाले.
केवळ निवडणुकीतील तिकिटासाठी समाजसेवा ही सेवा नाही, तर नि:स्वार्थीपणे सेवा करणे हीच खरी सेवा आहे, त्यामुळे केवळ राजकीय हेतूने सेवा करू नये, असेही ते म्हणाले. लोकांनी केवळ जय श्री रामच म्हणू नये, तर प्रभू रामासारखे बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले.