कोळी समाजाचे विविध मागण्यांबाबत राज्यमंत्री भरणे यांना निवेदन
भवानीनगर, -अनेक वर्षापासून महादेव कोळी समाजाच्या विविध मागण्यांबाबत कोळी महासंघ इंदापूर तालुक्याच्या वतीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना सपकळवाडी (ता. इंदापूर) येथे निवेदन देण्यात आले.
गेल्या 25 वर्षापासून अद्याप आम्हाला न्याय मिळालेला नाही. याऊलट (दि.21 डिसेंबर 2019) रोजी सामान्य प्रशासन विभागाने शासननिर्णय पारित करून सेवेत कायम असलेल्या अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांना सेवा समाप्त करून त्यांना 11 महिन्यांची तात्पुरती नियुक्ती देण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे राज्यातील 60 हजार कर्मचारी व त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहे.
ही बाब मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे आमच्या खालील मागण्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करावा. आमच्या प्रमुख मागण्या (दि. 21 डिसेंबर 2019) रोजीच्या शासन निर्णयामध्ये सेवाविषयक लाभ, सेवानिवृत्तीनंतरचे लाभ व पदोन्नतीचे लाभ देण्यासंदर्भात कोणतीही तरतूद केलेली नाही.
त्यानुसार तातडीने शुध्दीपत्रक काढून सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवून महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981-82 नुसार मिळणारे वेतन, सेवानिवृत्ती वेतन व सरळ सेवा भरतीच्या सर्व फायदे त्यांना अदा करावेत.
महादेव कोळी व कोळी महादेव हे एकच असल्याने जातीचे प्रमाणपत्र देताना शाळा सोडल्याच्या दाखल्यात महादेव कोळी असले तरी जात प्रमाणपत्र देताना कोळी महादेव असे देण्यात यावे, असे शासन निर्णय निर्गमित करावे. जातीचा दाखला देताना 1950 पूर्वीच्या पुरावा देण्यासंदर्भातला आग्रह करू नये.
जातीचा दाखला देताना क्षेत्रीय बंधनाची अट घालू नये. जातीचा दाखला अवैध झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करू नये. शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करत असताना शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील नमूद केलेल्या जातीवरून शिष्यवृत्ती मंजूर करावी.
अनुकंपा तत्वावर ज्या कर्मचाऱ्यांच्या नेमणूका केलेल्या आहेत त्या कर्मचाऱ्यांना जात पडताळणीची अट शिथील करावी. आशा आशयाचे पत्र कोळी महासंघ पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र हजारे, इंदापूर तालुकाध्यक्ष तात्यासाहेब घाटे, युवक अध्यक्ष शत्रुघ्न घाडगे यांच्यावतीने देण्यात आले.