-अमित डोंगरे
सिडनीची खेळपट्टी चक्क आशियाई खेळपट्टीसारखी वागली. वेळ आल्यावर कोण कसे वागेल सांगता येत नाही. सिडनीत कुंद वातावरण, थंडगार वारे, खेळपट्टीवर राखलेले गवत हे सगळे पाहून एकवेळ भारताच्या वेगवान गोलंदाज त्रयीला आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या. मात्र, हा आनंद अळवावरच्या पाण्यासारखा क्षणभंगूर ठरला. सामन्याच्या पहिल्या दिवशी तरी खेळपट्टी भारतीय संघाशी शत्रूसारखी वागली, आता उर्वरित दिवसांत ती कशी वर्तन करते यावरच या सामन्याचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
यजमान ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महंमद सिराजने डेव्हिड वॉर्नरचा पत्ताही लवकरच कट केला व थाटात सुरुवात केली. मात्र, त्यानंतर गचाळ क्षेत्ररक्षण आणि मिळालेल्या दोन संधी वाया घालवल्यामुळे सामन्यावर वर्चस्व राखण्यात भारतीय संघ अपयशी ठरला. आता शुक्रवारी सकाळच्या गारव्यात भारताच्या गोलंदाजांना थोडीफार साथ लाभली तर यजमान संघाला कमी धावसंख्येत गुंडाळता येईल.
पूर्वी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिकेचे संघ भारतीय खेळपट्ट्यांवर टीका करायचे. एकदम पाटा खेळपट्टी असते, त्यावर केवळ फिरकी गोलंदाजांनाच मदत मिळते वगैरे म्हणायचे. मात्र, आता त्यांच्याच देशात अशा रंग बदलणाऱ्या खेळपट्ट्या तयार होत आहेत, त्यावर कोण बोलणार. ऑस्ट्रेलियातील पर्थची खेळपट्टी जगातील सर्वात वेगवान खेळपट्टी होती. द फास्टेट विकेट ऑन अर्थ, कॉल्ड पर्थ, असे त्यावेळी बोलले जायचे. आता त्याच खेळपट्टीवर सहाशे धावा होताना पाहिल्या आहेत.
शेन वॉर्नसारखा फिरकीचा जादूगार संघात असतानाही त्यांनी फिरकीला पोषक खेळपट्टी कधी तयार केली नव्हती. कारण ग्लेन मॅकग्रासह त्यांची पेसबॅटरी अत्यंत भक्कम होती. मात्र, आता त्यांच्याकडेच वेगवान गोलंदाजांची खाण तोट्यात चाललेली असल्याने त्यांनाही पहिल्याच दिवशी खेळपट्टीवर भेगा पाहण्यात आनंद मिळत असावा. ऍडलेड, मेलबर्न आणि आता सिडनी या तीनही खेळपट्ट्या पाहिल्या तर असे जाणवते की ते देखील क्युरेटरशी जुगाड करून खेळपट्टी तयार करत आसावेत. ऍडलेडला त्यांच्या गोलंदाजांना यश मिळाले असे म्हणण्यापेक्षा भारताच्या फलंदाजांनी कच खाल्ली होती, असे म्हणावे लागेल.
मेलबर्नला त्यांचाच डाव त्यांच्यावरच बुमरॅंगसारखा उलटला. आता सिडनीचा इतिहास जरी त्यांच्या बाजूचा असला तरीही जर पहिल्या डावात त्यांना लवकर गुंडाळून भारताने मोठी धावसंख्या उभारली तर तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या दिवशी रवींद्र जडेजा व रवीचंद्रन अश्विन यांच्या तालावर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज गरबा खेळताना दिसले तर आश्चर्य वाटणार नाही. सिडनीची खेळपट्टी सरड्याप्रमाणे अचानक रंग बदलती झाल्यावर गोलंदाजांना फलंदाज कधी चूक करतो यावरच लक्ष ठेवून संयम राखावा लागतो. हेच पहिल्या दिवशी घडले. मेलबर्न कसोटीत पराभव पत्करल्यावर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज निश्चितच या सामन्यात भारताला कडवी लढत देतील. तसेच त्यांचे गोलंदाजही भारताच्या बलाढ्य फलंदाजीवर वर्चस्व राखण्यासाठी जीवाचे रान करतील. अशा स्थितीत आता या खेळपट्टीवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या गुणवत्तेवर विसंबून राहिले तरच भारतीय गोलंदाजांच्या हाती यश लागेल.