नवी दिल्ली: भारतातील ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणी भारत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने यापूर्वीच्या निर्णयात दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन पाकिस्तानकडून व्हावे अशी मागणी भारत करणार आहे. या प्रकरणी पूरक निर्देशांसाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेण्याची वेळ आली आहे.
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत नसल्याने भारताला हा निर्णय घ्यावा लागणार आहे. सद्यस्थिती पाहता भारत पाकिस्तानशी यासंदर्भात चर्चा करू पाहत आहे. पाकिस्तानने कुलभूषण यांची मुक्तता करावी असाच आमचा प्रयत्न आहे. मानवी दृष्टिकोनातून तरी कुलभूषण यांची सुटका व्हावी. परंतु पाकिस्तानने कुलभूषण यांचा मुद्दा विनाकारण ताणून धरल्याचे साळवे म्हणाले.
भारताने याप्रकरणी 4-5 पत्रे लिहिली असली तरीही पाकिस्तानची नकारघंटा कायम आहे. याप्रकरणी विदेशमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतल्याची माहिती साळवे यांनी दिली आहे. मागील वर्षी भारताने मोठा राजनयिक विजय मिळविला होता. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांना भारतीय राजननैतिकांशी व्हिएन्ना करारांतर्गत संपर्क करू देण्याचा आदेश पाकिस्तानला दिला होता.
कुलभूषण हे एकदिवशी निश्चित भारतात परततील असा ठाम विश्वास आहे. जागतिक पटलावर हा विषय लावून धरण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अध्यक्षांनी कुलभूषण यांचा खटला अत्यंत महत्त्वाचा असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. कुलभूषण यांची बाजू लावून धरल्याने पाकिस्तानला कुठलेच दुस्साहस करता येणार नसल्याचे साळवे म्हणाले.