मुंबई – ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील पराभवानंतर बीसीसीआयने संघातील वरिष्ठ खेळाडूंना यापुढे टी-20 संघात स्थान मिळणार नसल्याचे संकेत दिले आहेत. तसेच संघात जास्तीत जास्त युवा खेळाडूंनाच खेळवले जाईल असेही सांगितले आहे.
कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत, यजुवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, महंमद शमी, रवीचंद्रन अश्विन या वरिष्ठ खेळाडूंचा विचार यापुढे भारताचा टी-20 संघ निवडताना केला जाणार नाही, अशी माहिती मिळत आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, कठोर निर्णय घेत संघात मोठे बदल होणार हे समोर येत आहे.
2024 साली होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी बीसीसीआय आतापासूनच तयारी सुरु करणार आहे. नवोदित व युवा खेळाडूंची यापुढे जवळपास सगळ्याच टी-20 सामन्यांसाठी निवड करणे हाच बीसीसीआयच्या या नव्या योजनेचा भाग राहणार आहे. त्यामुळेच असेही सांगितले जात आहे की येत्या काळात ज्या खेळाडूंनी वयाची तीशी पार केली आहे, अशांना टी-20 संघ निवडीसाठी विचार केला जाणार नाही.
“पुढील विश्वकरंडक स्पर्धा जिंकायची असेल तर वरिष्ठांना…” वीरेंद्र सेहवागने व्यक्त केलं परखड मत
वर्कलोड कमी करणार
पुढील मोसमापासून बीसीसीआय कसोटी, एकदिवसीय तसेच टी-20 सामन्यांसाठी खास नियोजन करणार आहे. काही खेळाडूंना सगळ्याच मालिका किंवा सामने खेळवणार नसून ठराविक स्पर्धांसाठी विश्रांतीही दिली जाणार आहे. याच द्वारे खेळाडूंवरचा वर्कलोड कमी केला जाणार आहे.