बिबवेवाडी उपनगर वार्तापत्र : हर्षद कटारिया
शहराची “फुफ्फुसं’ म्हणून ओळख असलेल्या टेकड्यांवर दररोज हजारो नागरिक फिरण्यास येतात. झाडे लावा, झाडे जगवा, असा संदेश जनतेला सरकार गेली कित्येक वर्षांपासून देत आहे. तर, दुसरीकडे शहरातील अनेक टेकड्यांवर बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. क्रशर मशीन धडधडत आहेत. तळजाई टेकडीवरही विकासाच्या नावाखाली असेच काही प्रकार सुरू झाल्याने सिमेंटच्या जंगलात आता टेकडी अर्थात फुफ्फुसंही धोक्यात आली आहेत. तळजाई टेकवडीवर शहराच्या सीमेवर अतिक्रमण होण्याचा धोका असून येथे सीमाभिंत बांधून टेकडी सुरक्षित करणे सुद्धा आवश्यक आहे.
पुणे शहर आस्ताव्यस्त विस्तारत असताना महानगरपालिकेसह पीएमआरडीएचीही भूमिका महत्तवाची ठरत आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली विकास अराखड्यातून निसर्गाशी संलग्न किती तरी गोष्टी दुर्लक्षित राहात आहेत. त्यातीलच एक टेकड्यांचा विषय सांगता येईल. शहराची फुफ्फुसं म्हणून ओळख असलेल्या या टेकड्यांवर वृक्षारोपनासारखे उपक्रम राबविणे गरजेचे असताना विकासकामांच्या नावाखाली नको ते उपक्रम राबवले जात आहेत. यातून टेकड्यांच्या नैसर्गिक सौंदर्याला बाधा पोहचत आहे. तळजाई टेकडीबाबतही असेच काहीसे घडत आहे.
टेकडी सुशोभीकरणाच्या नावाखाली होत असलेला “विकास’ पाहून नको असला विकास, अशीच प्रतिक्रिया येथे येणाऱ्या नागरिकांतून उमटत आहे. विकासाला कोणाचाही विरोध नाही. पण, अशा विकासातून निसर्गाचा ऱ्हास होत असेल तर असला विकास कोणाच्या कामाचा? तळजाई टेकडीवर सिमेंटीकरणाचे काम महापालिकेकडून सुरू असल्याने पालिकेच्या पर्यावरणवादी धोरणाचे काय? असा प्रश्न यातून उपस्थित होऊ लागला आहे. टेकडीवर सिमेंटीकरण झाले तर पावसाचे पाणी टेकडीवर कसे मुरेल? नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवण्याकरिता जे उपक्रम राबविणे गरजेचे आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून सिमेंटीकरण मोठ्या प्रमाणात होत असल्याने टेकडीवरील पर्यावरण धोक्यात आले आहे. वॉकिंगसाठी बसविण्यात आलेले पेव्हिंग ब्लॉक्स आणि त्याकरिता होत असलेले सिमेंटीकरण येथील हिरवाईला बाधा पोहचविणारे ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पुणेकरांना शुद्ध हवा मिळण्यासाठी आता केवळ शहराचे वैभव व खऱ्या अर्थाने फुफ्फुसं असलेल्या टेकड्यांचाच आसरा आहे. परंतु, विकासकामांच्या नावाखाली आता स्थानिक लोकप्रतिनिधींनी श्रेयवादाच्या नादात विकासाच्या नावाखाली सिमेंटीकरण सुरू केले आहे. मोठे सिमेंटचे रस्ते, सिमेंटचेच लहान-मोठे स्ट्रक्चर उभे करण्यात आल्याने नैसर्ग सौंदर्याला बाधा पोहचली आहे. टेकड्यांवरील जैवविविधता टिकली पाहिजे, यासाठी हजारो पर्यावरणप्रेमी येथे वृक्षारोपणासह झाडे जगविण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात.
पाचगाव पर्वती वनविहार साधारण 550 ते 600 एकर क्षेत्रावर वसले असून मुख्य रस्ता हा प्रवेशद्वार सहकारनगर भागातून गांधी ट्रेंनिंग वरून रस्त्याने मुख्य वनविहाराच्या गेटजवळ जातो. साधारणपणे संमिश्र, अशी स्वदेशी परदेशी म्हणजेच काही भागात ग्लिरीसिडिया, सुबाभूळ, निलगिरी, गुलमोहर अशा प्रकारचे वृक्ष आढळतात तर काही अन्य भागात काटेसावर, गणेर, साग, चंदन, वड, पिंपळ, पळस असे स्वदेशी वृक्ष देखील येथील जैवविविधतेत भर टाकतात. टेकवडीवर बुलबुल, हळद्या, कोतवाल, टीकल ब्लू फ्लायकॅचर, स्वर्गीय नर्तक (पॅराडाइज फ्लायकॅचर), मोर, पोपट, रॉबिन, होला, सातभाई, ससे, वेडा राघू तसेच धामण व काही इतर सापांच्या जाती आहेत.
येथील जैवविविधता कायम राहावी याकरिता टेलस ऑर्गनायझेशन सारख्या निसर्ग हित जपणाऱ्या संस्था गेले अनेक वर्षे विविध प्रकारचे उपक्रम राबवित आहे. अनेक संस्था, तसेच व्यक्ती, पर्यावरण प्रेमी, सुज्ज्ञ नागरिक झाडांना पाणी देणे, कचरा साफ करणे, पक्ष्यांना, प्राण्यासाठी धान्य व पाणी उपलब्ध करणे, असे उपक्रम गेली अनेक वर्षे राबवित आहेत. परंतु, गेल्या काही वर्षांत येथील काही भागात होणारी वृक्षतोड, आगी लागणे, वणवे, भटक्या कुत्रांचा उपद्रव, पाण्याची कमतरता व अन्य कारणामुळे येथील निसर्ग सौंदर्याला बाधा पोहचत आहे.
राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई का नाही?
रस्त्यावर नागरिकाने राडारोडा टाकला तर, त्याच्यावर महापालिका कारवाई करते. मग, टेकडीवर कचरा, राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई का होत नाही. टेकडीवर जर काही काम करायचे असेल, तर त्या संबंधित कामाचा फलक या ठिकाणी लावला गेला पाहिजे. या कामासाठी नागरिकांच्या हरकती घेतल्या पाहिजेत. या जागेवर कोणते आरक्षण टाकलेले आहे का? या बाबींवर विचार करून पुढील कामे केली पाहिजेत. पर्यावरणप्रेमी व सर्वसामान्य पुणेकांच्या प्रयत्नांमुळे टिकून राहिलेल्या तळजाई टेकडीचा ऱ्हास न होता येथील जैवविविधता टिकावी व बहरावी हीच सर्व सामान्य निसर्गप्रेमींची अपेक्षा आहे.