खडकवासलातून मोठा विसर्ग सोडल्याने टाकाऊ वस्तू आल्या वाहून
लोणीकाळभोर- धरण क्षेत्रांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्यानंतर मुळा-मुठा नदीतून जलपर्णीसह सर्व कचरा, घाणही नव्या कालव्यातून वाहत असल्याने येथील शेतकऱ्यांसाठी ही डोकेदुखी ठरत आहे. कालवा सध्या भरून वाहत असला तरी याच पाण्यात पुणे शहरातील सांडपाणी तसेच पिंपरी-चिंचवड येथील औद्योगिक वसाहतीतून सोडण्यात आलेले दूषित पाणीही मिसळल्याने धरणांतून सोडण्यात आलेले पाणीही दुषित झाले आहे.
खडकवासला धरणातून आता नदीत पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. यामुळे नदीसह यावरील कालव्याच्या काठावरील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. धरणांतून सोडण्यात आलेले पाणी तरी चांगले असेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतून सांडपाणी नदीत येतच असल्याने तसेच यामध्ये जलपर्णी, कचऱ्याची भर पडल्याने याचा शेतकऱ्यांना मोठा त्रास होत आहे.
खडकवासला धरणांतून पावसाळ्यात व्यतिरीक्त एक थेंबही पाणी नदीपात्रात सोडले जात नाही. नेमक्या याच स्थितीचा फायदा घेत वर्षातील सुमारे आठ महिने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातून कुठलीही प्रक्रिया न करताच नदीपात्रात सांडपाणी, मलजल व कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी सोडीले जात असल्याने येथील कालव्यांना येणारे पाणी हे दुषितच असते.
यावेळी तर धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्याने या पाण्याबरोबर जलपर्णी, कचरा मोठ्या प्रमाणात कालव्यातही वाहून आला आहे. त्यातच पूर्वी हवेलीतील गावांसह दौंड, बारामतीतही हेच पाणी दुषित पाणी जात असल्याने कालव्याच्या काठावरील रहिवासी तसेच तेथील शेतकऱ्यांनाही कचरा वाहून आलेले दुषित पाणी वापरावे लागत आहे. शेतीकरीता हे पाणी गजरेचे असले तरी कचरा पाण्यात येत असल्याने असा कचरा गोळा करण्याचे शेतकऱ्यांचे काम वाढले आहे. या कचऱ्यात काही हानीकारक वस्तूही येत असल्याने याचा फटका जमीनीची धूप कमी होण्यापासून पीकांच्य ा वाढीवरही याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
- शेतीला चांगले पाणी नाहीच…
पुणे महानगरपालिकेने नदीत सोडल्या जात असलेल्या साडेसहा टीएमसी मैला पाण्यावर प्रक्रिया करून ते शेती सिंचनासाठी उपलब्ध करून द्यावे, असे आदेश तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महानगरपालिकेला दिले होते. त्यानंतर युतीची सत्ता आल्यानंतर राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुंढवा येथील जॅकवेलच्या कामात पुढाकार घेतला. साडेसतरा नळी येथे हे काम पूर्णही करण्यात आले परंतु, त्यानंतरही शेतीसाठी चांगले पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांत राजकारण्यांविषयी नाराजी आहे.