पवनानगर – मावळ तालुक्यासह संपूर्ण राज्यभरात गेल्या काही दिवसांपासुन उन्हाचा तडाखा वाढला आहे. नागरिक शक्यतो दुपारी बाहेर जाण्याचे टाळत आहेत. शेतकरी वर्गदेखील सकाळच्या प्रहरी शेतातील कामे मार्गी लावत आहे. परिणामी शेतीच्या कामांना दुपारी काहीसा ब्रेक लागल्याचे चित्र आहे. नागरिकदेखील असतील ती कामे सकाळी व संध्याकाळी करत आहे. तर दुपारी रस्त्यावरील वाहनांची वर्दळही मंदावली आहे.
दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका तीव्र असल्याने नागरिक घराबाहेर पडत नसल्याने व्यापारी, दुकानदार, किरकोळ विक्रते दुपारच्या वेळेस काही प्रमाणात व्यवहार बंद ठेवत आहेत. उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे अनेकांना डोळे, अशक्तपणा,त्वचा विकार व इतर त्रास जाणवू लागले आहेत. तर वातावरणातील सतताच्या बदलामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
एरव्ही भरभरून वाहणारे मावळातील रस्ते दुपारी निर्मनुष्य दिसत असुन, वाहनांची गर्दी कमी दिसत आहे. उन्हाच्या तडकायापासून बचाव करण्यासाठी दुपारी व रात्री घरोघरी पंखे, कुलर चालू ठेवले जात आहेत. तर प्रवाशांकडून बाटली बंद थंड पाण्याची मागणी वाढली आहे.
अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाच्या तडाख्याने आईस्क्रीम, कुल्फी सरबत, ताक, लस्सी आदींना मागणी आहे. तर उसाच्या गुऱ्हाळ्यावरदेखील नागरिक गर्दी करु लागले आहे. शरीरात गारवा निर्माण करणारे कलिंगड, काकडी, खरबुजांच्या खरेदीस नागरिकांची पसंत वाढली आहे. तहान शमविण्यासाठी माठातील थंड पाणी व थंड पदार्थ सेवानकडे कल वाढला आहे. बाटलीबंद शीतपेयांपेक्षा घरगुती शीतपेयाच्या सेवनाकडे ज्येष्ठ नागरिकांचा कल आहे. दुचाकी व चारचाकीवरून प्रवास करणारे प्रवासी, नागरिक व शेतकरी झाडाच्या सावलीत विश्रांती घेत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रवासादरम्यान उन्हापासून बचाव करण्यासाठी तोंडाला स्कार्फ, ओढणी तर डोक्यावर टोपीचा वापर करत आहेत.