पाटणा – ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारमधील विरोधकांच्या महाआघाडीत फूट पडली आहे. माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांचा हिंदुस्थानी अवाम मोर्चा-धर्मनिरपेक्ष (एचएएम) हा पक्ष महाआघाडीतून बाहेर पडला आहे.
बिहारमधील पाच विरोधी पक्षांच्या महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय गुरूवारी एचएएमने मांझी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतला. महाआघाडीचे नेतृत्व करणारा राजद मित्रपक्षांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप एचएएमने केला. त्या पक्षाच्या निर्णयामुळे विरोधकांच्या ऐक्याला तडा गेला आहे. महाआघाडीतील इतर घटक पक्षांमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रीय लोक समता पक्ष आणि विकासशील इन्सान पक्षाचा समावेश आहे.
महाआघाडीतून बाहेर पडल्यानंतर पुढील रणनीतीबाबत एचएएमने तूर्त मौन बाळगले आहे. तो पक्ष याआधी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा घटक होता. मात्र, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जेडीयू पुन्हा एनडीएचा घटक बनल्यानंतर एचएएमने विरोधकांच्या महाआघाडीत जाणे पसंत केले. आता त्या पक्षाचे महाआघाडीतूनही बाहेर पडणे नव्या राजकीय समीकरणांची नांदी मानले जात आहे. बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे.