नवी दिल्ली – माहिती तंत्रज्ञानानंतर आता औषधी क्षेत्र भारताला निर्यातीचा मजबूत आधार देत असल्याचे दिसून येत आहे. जागतिक पातळीवर मंदी, अनेक देशादरम्यान चाललेले व्यापार युद्ध असतानाही सरलेल्या वर्षात औषधांच्या निर्यातीत तब्बल 11 टक्के वाढ होऊन ती 19.2 अब्ज डॉलर झाली आहे.
त्याचबरोबर या निर्यातीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहेत. विशेष म्हणजे औषधी क्षेत्राची निर्यात ही विकसित देशात म्हणजे उत्तर अमेरिका आणि युरोपातील देशात होत असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. जर या क्षेत्राने ठरविले तर इतर देशात भारताची निर्यात वाढण्यास मोठा वाव आहे.
2017-18 मध्ये औषधी क्षेत्राची निर्यात 17.3 अब्ज डॉलर होती. मात्र निर्यात वाढविण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाबरोबरच औषधी कंपन्यांनी चांगले प्रयत्न केले असल्यामुळे या क्षेत्रातील निर्यात वाढण्यास मदत होत असल्याचे दिसून आले. उत्तर अमेरिकेतील निर्यातीचा वाटा एकूण निर्यातीत 30 टक्के आहे तर युरोपातील देशांचा वाटा 16 टक्के व आफ्रिकेतील देशांचा वाटा 19 टक्के आहे.
त्याचबरोबर आता चीननेही भारतातील औषधी विकत घेण्यास सुरुवात केली आहे.त्यासाठी भारत सरकारचे चीनबरोबर अनेक पातळ्यांवर प्रयत्न चालू आहेत. तेथे निर्यात वाढण्यास मोठा वाव असल्याचे वाणिज्य
मंत्रालयाने म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिका, रशिया, ब्राझील, जर्मनी या देशाकडूनही भारतीय औषधांना मागणी वाढत आहे. सध्या भारताच्या एकूण निर्यातीत औषधी क्षेत्राचा वाटा तब्बल सहा टक्के आहे. गेल्या वर्षी भारताने 331 अब्ज डॉलरची निर्यात केली होती. निर्यात वाढल्यानंतर चालू खात्यावरील तूट मर्यादित राहते आणि त्यामुळे भारताचे चलन स्थिर राहते. यासाठी निर्यात वाढविण्यावर केंद्र सरकार भर देत आहे व राज्यानी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. भारतात जेनेरिक औषधी बरीच तयार होते. त्यामुळे या क्षेत्रातून निर्यात वाढण्यास वाव आहेत.