कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाबाबत पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळाला पक्षापुरता जरी पूर्णविराम मिळाला असला, तरी यानिमित्ताने केवळ कॉंग्रेसच नव्हे सर्वच पक्षांमध्ये नेतृत्वाचा आणि नेतृत्वकौशल्याचा धांडोळा घेतला जात आहे.
काही नेत्यांनी पाठवलेल्या पत्रामुळे कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाबाबत संभ्रम आणि संशय निर्माण झाल्यानंतर कॉंग्रेस पक्षाचा प्रमुख विरोधक असलेल्या भाजपने ही संधी साधून कॉंग्रेस संघटनेच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला असला, तरी प्रत्येक पक्षांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतात. केवळ निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या मापदंडावरच एखाद्या पक्षाच्या नेत्याची कार्यक्षमता मोजली जाते. सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागल्याने कॉंग्रेसच्या विद्यमान नेत्यांच्या नेतृत्वाबाबत शंका व्यक्त केली जात असली तरी गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यांत कॉंग्रेस पक्षाने चांगली कामगिरी केली होती.
भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता, हेही विसरता येणार नाही. अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने लागोपाठच्या दोन निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून दिल्यामुळे अमित शहा यांच्या नेतृत्वाची चर्चा होते. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा निवडणूक प्रचाराचे प्रमुख आधारस्तंभ असल्याने भाजपला निवडणुकीत मिळालेल्या यशाचा मोठा वाटा त्यांना देण्यात येतो. केवळ निवडणुकीतील यशामुळे या दोन नेत्यांच्या नेतृत्वाची चर्चा केली जाते. अर्थात, जेव्हा राजस्थानमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागला आणि कॉंग्रेसला सत्ता मिळाली तेव्हा अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबाबत शंका घेण्यात आली आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करण्यात आले होते.
केवळ याच दोन पक्षांबाबतीत असे घडते असे नाही. बहुतेक सर्वच पक्षांमध्ये एखाद्या नेत्याची कार्यक्षमता केवळ त्याने निवडणुकीत पक्षाला मिळवून दिलेल्या यशावरच मोजली जाते, हे वास्तव भारतीय लोकशाहीत तरी गेली कित्येक वर्षे कायम आहे. आणीबाणीनंतरच्या काळात इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसला मोठा पराभव पत्करावा लागला होता. तेव्हाही इंदिरा गांधी यांचे राजकारण संपले, अशी ओरड करण्यात येत होती. पण 1980 मध्ये झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी मोठे यश मिळवल्याने पुन्हा त्यांच्या नेतृत्वाची चर्चा सुरू झाली.
भारतात अशी अनेक उदाहरणे देता येतील. ओडिशामध्ये गेली अनेक वर्षे नवीन पटनाईक यांच्या नेतृत्वाखालील बिजू जनता दलाची सत्ता आहे. कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रचंड प्रयत्न करूनही या राज्यांमध्ये त्यांना शिरकाव करता आलेला नाही. जरी एकेकाळी बिजू पटनाईक हे भाजप आघाडीचे भाग होते, तरी नंतरच्या काळात त्यांनी स्वतःचे नेतृत्वगुण दाखवून प्रादेशिक पातळीवर स्वतःच्या पक्षाचे वेगळे महत्त्व निर्माण केले. त्यामुळेच आज ओडिशा म्हणजे नवीन पटनाईक असे समीकरण तयार झाले. कारण लोकसभा असो किंवा विधानसभा, निवडणुकीत सातत्याने मिळालेल्या यशामुळे नवीन पटनाईक यांचे नेतृत्व चर्चेचा विषय ठरले. हाच निकष पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि बिहारमध्ये नितीशकुमार यांच्याबाबत लावला जाऊ शकतो.
आपापल्या प्रादेशिक पातळीवर त्यांनी पक्ष संघटनेवर मोठा ठसा उमटवल्यामुळेच निवडणुकीमध्ये या दोन्ही नेत्यांना चांगले यश मिळत आहे. महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाल्यास एखादा पक्ष संघटनकौशल्य आणि संपर्क याच्या जोरावर कसा वाढवायचा याचे उत्तम उदाहरण म्हणून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उदाहरण द्यावे लागते. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनेही गेल्या काही वर्षांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. कारण पुन्हा एकदा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत त्यांच्या पक्षांनी निवडणुकीत मिळवलेले यश हाच निकष महत्त्वाचा ठरतो.
आता तर महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे कॉंग्रेससोबत संयुक्त सरकार आहे. देशातील ज्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष प्रबळ आहेत, त्याठिकाणी त्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि निवडणुकीतील यशामुळे ते नेते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. हे सर्व सांगायचे कारण हेच की, लोकशाहीच्या राजकारणामध्ये शेवटी एखादा पक्ष चांगले काम करत आहे का नाही, हे ठरवण्यासाठी निवडणुकीतील यश हा एकच निकष वापरला जाऊ शकतो. या निकषावरच सध्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाकडे पाहिले जात असल्यामुळे विनाकारण त्यांच्या नेतृत्वाबाबत शंका उत्पन्न केली जात आहे.
केवळ लोकसभा निवडणुकीतील सातत्यपूर्ण पराभव हेच एखाद्या पक्ष संघटनेचे काम चांगले नाही, हे ठरवण्याचा निकष मानावा का, हा आता चर्चेचा विषय ठरू शकतो. कारण कॉंग्रेसला लोकसभा निवडणुकीत सातत्यपूर्ण पराभवाशी सामना करावा लागला असला तरी विधानसभा निवडणुकीत मात्र पक्षाला चांगले यश मिळत आहे. त्या त्या राज्यांमध्ये कॉंग्रेस पक्ष संघटनेकडे चांगले नेतृत्व असेल तर त्याचा फायदा कॉंग्रेसला झाला आहे, असाही निष्कर्ष यावेळी काढावा लागतो. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या नेतृत्वामुळेच कॉंग्रेसला सत्ता मिळाली होती. त्याचबरोबर दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा प्रभाव दिसून येतो.
कर्नाटक, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्येही विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले होते, पण शेवटी लोकसभा निवडणुकीतील यश महत्त्वाचे असल्याने साहजिकच आता आगामी लोकसभा निवडणुकीतील यशासाठी कॉंग्रेसला तयारी करावी लागेल. येत्या काही कालावधीमध्ये जर राहुल गांधी यांच्या हातात नेतृत्व जाणार असेल, तर आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये चांगले यश मिळूनच राहुल गांधी यांना आपल्या नेतृत्वाचा करिश्मा दाखवून द्यावा लागेल.
खरेतर गेल्या दोन निवडणुकीमध्ये प्रचार काळात राहुल गांधी यांनी जोरदार प्रचार केला होता, त्या मानाने पक्षाला यश न मिळाल्यानेच त्यांच्या नेतृत्वाचा विषय समोर आला. अर्थात, गेल्या निवडणुकीनंतर राहुल गांधी काही काळ एकदमच जनसंपर्कातून दूर गेल्याने त्याचीही चर्चा झाली. कारण शेवटी लोकशाही राजकारणात निवडणुकीतील यशच महत्त्वाचे असते. आगामी काळात कॉंग्रेसने त्याच दिशेने पावले टाकावी.