सध्या सुरू असलेल्या पावसाचा पिकांना फायदा
लाखणगाव- आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी, धामणी, पोंदेवाडी, खडकवाडी, वाळुंजनगर परिसरात व शिरूर तालुक्याच्या थापेवाडी, पिंपळवाडी, ढगेवाडी परिसरात या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने बाजरीचे पीक सध्या जोमात आले आहे. सध्या बाजरीची कणसे फुलोऱ्यात आली असल्यामुळे शेतकरी आनंदात दिसत आहे.
या वर्षी पावसाने चांगली हजेरी लावल्याने खरीप हंगामातील सर्वच पिके जोमात आली असले तरी अजूनही या भागातील ओढ्या-नाल्यांना पूर आला नाही. त्यातच आता जवळ-जवळ पंधरा ते वीस दिवस पावसाने दडी मारली होती. सध्या विविध पिकांना सध्या पावसाची नितांत गरज आहे. सोमवारी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. बाजरीचे पीक हमखास येणार असल्याने एका बाजूला धान्याचा तर दुसऱ्या बाजूला जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
लोणी, धामणी, वडगावपीर, खडकवाडी, पहाडदरा, पोंदेवाडी, वाळुंजनगर या परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजरीच पीक घेतात. त्यामुळे धान्याबरोबरच वैरणही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. एकंदरीतच या वर्षी बाजरीचे पीक शंभर टक्के हाती लागणार असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पावसाला सुरवात झाल्यामुळे शेतकरी आनंदीत आहेत. मागील पंधरा ते वीस दिवस पावसाने कलटी मारली होती. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते, परंतु सध्या पुन्हा पावसाने हजेरी लावल्याचा फायदा शेती पिकांना होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या शेती पिकांना पाण्याची अत्यंत गरज होती. अशातच पावसाला सुरुवात झाल्याने बाजरी पिकासह अन्य पिकांना याचा फायदा होणार आहे.
सध्या या परिसरात बाजरी फुलोऱ्यात आली आहे, परंतु पावसाने दडी मारल्यामुळे पीक धोक्यात आले होते. त्यामुळे बाजरीला पाण्याची गरज निर्माण झाली होती. पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या लोणी, धामणी, वडगावपीर, मांदळेवाडी, पहाडदरा, खडकवाडी, शिरदाळे या गावांत पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे फुलोऱ्यात आलेल्या बाजरी पिकाच्या उत्पादनात वाढ होणार आहे. यावर्षी बाजरी पीक हमखास येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
- मागील वर्षी उत्पादन घटले
मागील वर्षी कमी पावसामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात बाजरीचे उत्पादन घटले होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता, परंतु यावर्षी बाजरीचे पीक चांगले येणार असल्याने शेतकरी आनंदीत आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाचा फायदा येथील शेती पिकांना होणार आहे.