मोटेवाडी तलाव कोरडा : चासकमान पोटचारीतून आवर्तनाचा शिडकावा
निमोणे – मोटेवाडी (ता. शिरुर) येथील पाझर तलाव कोरडा पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मोटेवाडी, लंघेवाडी, चव्हाणवाडी येथील पिके धोक्यात आली आहेत.
पावसाने पाठ फिरवल्याने बाजरीची फुलोऱ्यात आलेली पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. तलावात पाणी न आल्यास कांदा पीक कसे घ्यायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. या तलावात लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी मोटेवाडी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, पाणी न सोडल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावर्षी जूनपासून शिरुर तालुक्याच्या काही भागात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. अनेक गावातील पाझर तलाव कोरडेच आहेत. मोटेवाडी येथील पाझर तलावात चासकमानच्या पोटचारीतून पाणी सोडले जाते. परंतु रोटेशन आल्यावर फक्त दोनच दिवस पाणी सोडण्यात आल्याने पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. त्यामुळे सध्या हा तलाव कोरडा ठणठणीत पडला आहे. पाऊस नसल्याने विहिरी, बोअरवेलची पाण्याची पातळी घटली आहे. त्यामुळे तलावात चासकमानच्या पोटचारीतून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.