नवी दिल्ली – ग्रामपंचायतींमध्ये सर्वसमावेशक विकास करणाऱ्या राज्यातील 5 ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी, कुंडल आणि पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी या ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला व्दितीय क्रमांकाच्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अलाबाद या ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाच्या पुरस्काने केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
येथील विज्ञान भवनात केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज विभागाच्या वतीने 17 ते 21 एप्रिलपर्यंत “राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत आज राष्ट्रीय पंचायत पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री गिरिराज सिंह, केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील उपस्थित होते.
संयुक्त राष्ट्राने ठरविलेल्या विविध 9 श्रेणीतील सतत विकासाच्या मानकांनुसार द्रारिद्रयमुक्त आणि सुधारित उपजीवीका श्रेणीत सर्वोत्कृष्ट कार्य करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील तालुका पलुस येथील खंडोबाचीवाडी आणि स्वच्छ आणि हरित पंचायत म्हणुन कुंडल या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यासह दोन्ही ग्रामपंचायतींच्या बॅंक खात्यात थेट प्रत्येकी एक कोटी रुपयांची रकम जमा करण्यात आली. खंडोबाचीवाडीचे सरपंच धंनजय गायकवाड, उपसरपंच उत्तम जाधव, ग्रामसेवक स्वप्नगंधा बाबर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील टिकेकरवाडी या ग्रामपंचायतीला ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार आज राष्ट्रपती यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार सरपंच संतोष टिकेकर, गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी, ग्रामसेवक अस्लम हूसेन शेख यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या ग्राम पंचायतीने सोलर पॅनल, पवनचक्की, बॉयोगॅसच्या माध्यमातून 15 हजार वॅट विद्युत निर्मित केली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी आज ग्रामपंचायतीचा गौरव झाला. स्वच्छ आणि हरित पंचायत या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कुंडल ग्राम पंचायतीला गौरविण्यात आले. पुरस्कार सरपंच दगडू खाडे, गट विकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील, ग्रामसेवक महादेव यल्लाटे यांनी स्वीकारला.