पुणे- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेतली जाणारी “संयुक्त मुख्य परीक्षा 2020′ लांबली आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेले उमेदवार निराश झाले आहेत. त्यांनी आता आक्रमक पवित्रा घेत ही परीक्षा लवकर घेण्याची मागणी पत्रकार परिषदेत मांडली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त गट-ब 2020 या परीक्षेच्या पूर्वपरीक्षेतील काही प्रश्न रद्द करण्यात आले होते. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या विरोधात काही उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या परीक्षेची मुख्य परीक्षा गेल्या चार महिन्यांपासून रखडली आहे. आता राज्य सरकारने आयोगाशी समन्वय साधून महाधिवक्ता यांच्याद्वारे उच्च न्यायालयात विद्यार्थ्यांची बाजू मांडावी, असेही या उमेदवारांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संयुक्त पूर्व परीक्षा 4 सप्टेंबर 2021 रोजी घेतली होती. तिची पहिली उत्तरतालिका जाहीर करताना त्यावर परीक्षार्थींच्या हरकती मागवल्या होत्या. याआधारे आयोगाने काही प्रश्नांची उत्तरे बदलली आणि काही प्रश्न रद्द केले.
त्यावर उमेदवारांनी आयोगाकडे पत्रव्यवहार करून नवीन उत्तरतालिका लावण्याची मागणी केली. आयोगाच्या इतिहासात तिसरी उत्तरतालिका लावण्याची वेळ पहिल्यांदाच आली होती. आयोगाने तिसऱ्या उत्तरतालिकेत 5 प्रश्न रद्द केले. त्यामुळे सुमारे 4 हजार उमेदवारांचे गुण कमी झाले आणि ते मुख्य परीक्षेसाठी अपात्र झाले. त्यामुळे काही उमेदवारांनी आयोगाविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात (मॅट) 21 नोव्हेंबर 2021 रोजी, तर, काही उमेदवारांनी मुंबई खंडपीठात (मॅट) 24 डिसेंबर 2021 रोजी याचिका दाखल केली. यात मुंबई खंडपीठाने एमपीएससीच्या बाजूने निर्णय देत तिसरी उत्तरतालिका अधिकृत ठरवली. त्याविरोधात पुन्हा काही उमेदवरांनी मुंबई उच्च न्यायालयात 4 जानेवारी 2022 याचिका दाखल केली. यावर अजूनही सुनावणी न झाल्याने परीक्षा रखडली आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त गट-ब
*पदे – पोलीस उपनिरीक्षक, विक्री कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी
*जाहिरात प्रसिद्ध : फेब्रुवारी 2020
*पूर्व परीक्षा : 4 सप्टेंबर 2021
*नियोजित मुख्य परीक्षा : 29, 30 जानेवारी 2022 (रद्द झाली)
*सध्या याचिका : 5
*याचिकाकर्ते : 384
*पूर्व परीक्षा दिलेले उमेदवार : अंदाजे 3 लाख
*मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवार : 13,909
एमपीएससीच्या कारभारामुळे उमेदवारांचे नुकसान होत आहे. एकच परीक्षा दोन-दोन वर्षे रखडली जात असेल, तर विद्यार्थ्यांनी किती दिवस एकाच परीक्षेचा अभ्यास करायचा? राज्य सरकारने यात मध्यस्थी करुन आमची सुटका करावी.
– अमित कुचेकर, स्पर्धा परीक्षा उमेदवार