पुणे – पावसाने उघडीप दिल्यामुळे मागील आठ दिवसांपासून शहरातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. गुरुवारी शहरातील कमाल तापमानाने 32 अंशांपर्यंत मजल मारल्यामुळे दिवसभर उन्हाचा चटका जाणवत होता. तसेच उकाड्याने नागरिक हैराण झाले.
पुणे शहरासह जिल्ह्यात गुरुवारपासून पाऊस पुन्हा हजेरी लावेल अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे दिवसभर उन्हाचा चटका बसत होता. दरम्यान, राज्यातही कमाल तापमान वाढले असून, सर्वाधिक वर्धा येथे 40 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. गेल्या 24 तासांत कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रातील तुरळक भागात पाऊस झाला. तर आज दिवसभरात कोकण-गोव्यातील मुंबई, रत्नागिरी आणि विदर्भातील ब्रह्मपुरी येथे पाऊस झाला.