भुईंज: वेळे, ता. वाई गावच्या हद्दीत विनापरवाना खैर जातीच्या वृक्षांची तोड करणाऱ्या आठ जणांच्या टोळीला वाई वनविभागाने धडक कारवाई करत जेरबंद केले. जेरबंद करण्यात आलेल्या टोळीतील आठहीजण हे पालघर जिल्ह्यातील आहेत. वाई वनविभागाचे अधिकारी महेश झांजुर्णे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
दरम्यान, सर्व आरोपींना वाई न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वेळे येथील वनविभागाच्या हद्दीत घुसून पालघर जिल्ह्यातील एका टोळीने वन्य प्राण्यांची शिकार करणे तसेच खैर जातीच्या वृक्षांची विनापरवाना तोड करत असल्याची माहिती वन विभागाचे अधिकारी महेश झांजुर्णे यांना खबऱ्यांमार्फत मिळताच त्यांनी आपले सहकारी सहकांत शिंदे, सुरेश सूर्यवंशी, लक्ष्मण देशमुख, अजित पाटील, वैभव शिंदे, प्रदीप जोशी यांनी सापळा रचून त्या टोळीला जेरबंद केले.
रविंद्र रामजी जाधव (वय 24), योगेश सिताराम जाधव (वय 23), इंद्रेश काशु जाधव (वय 27), सिताराम महादु जाधव (वय 50), काशु चैतु जाधव (वय 55), लक्ष्मण देवजी जाधव (वय 28) अनिल रमेश जाधव (वय 23), सुनिल काशु जाधव (वय 24) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे चौकशी केली असता प्राणी मारण्याच्या साहित्यासह खैर जातीच्या लाकडांचा साठा वनविभागाच्या पथकाला आढळून आला. या आठही जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.