इस्लामाबाद – पाकिस्तानच्या तावडीत असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेबाबत फेरविचारासाठी पाकिस्तानकडून वेगवेगळ्या कायदेशीर पर्यायांचा विचार केला जात आहे. पाकिस्तानच्या लष्कराच्यावतीने बुधवारी ही माहिती देण्यात आली.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी लष्करी कायद्यात दुरुस्ती करण्याचा विचार पाकिस्तान सरकारकडून केला जात आहे. या पार्श्वभुमीवर जाधव प्रकरणी ही नवी माहिती पुढे आली आहे. पाकिस्तान सशस्त्र दलाचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी मात्र लष्करी कायद्यातील दुरुस्तीचे वृत्त हा केवळ एक अंदाज असल्याचे म्हटले आहे.
सुधारित कायद्यात लष्करी कोर्टाने केलेल्या शिक्षेविरोधात दिवाणी न्यायालयांमध्ये उपाय शोधण्याच्या प्रक्रियेची रूपरेषा दर्शविली जाईल, असे या संदर्भातील वृत्तात म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) 17 जुलै रोजी जाधव यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेचा पाकिस्तानने विचार केला पाहिजे असा निर्णय दिला. हा निर्णय म्हणजे भारताच्या दृष्टीने मोठा विजय मानला जात आहे. मात्र या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पाकिस्तान सरकार लष्करी कायद्यात सुधारणा करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त खोटे आहे, असे गफूर यांनी म्हटले आहे.