सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघाच्या बहुचर्चित पोटनिवडणुकीत जनतेने दिलेला कौल मी नम्रपणे स्वीकारत आहे. अत्यांत चुरशीच्या निवडणुकीत भरभरून साथ दिली, मनापासून आशीर्वाद देणाऱ्या मतदारांचे आणि ज्यांनी प्रतिसाद दिला नाही, अशा मतदारांचेही मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया भाजपा-शिवसेना मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.
उदयनराजे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, तीन-चार महिन्यांत खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा कौल घेण्याचा निर्णय मतदारराजाला रुचला नसावा. माझ्याकडूनही काही बाबतीत दुर्लक्ष झाले असावे म्हणूनच जनतेने दिलेला कौल मान्य आहे. निवडणुकीत जय-पराजय असतोच. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक धुरंदर व्यक्तींनाही अपयशाचा सामना करावा लागला आहे. म्हणूनच पराभवाने खचून न जाता, पुन्हा नव्या उमेदीने मी जनसेवेसाठी झोकून देणार आहे. असा आश्वासक दिलासा त्यांनी जनतेला दिला आहे.