आजपर्यंत विक्रमी 1023 मिमी पाऊस
शिंदे वासुली – खेड तालुक्यातील चाकण औद्योगिक वसाहत व चाकण ते सतरा गावांसाठी आणि पुणे शहर पूर्वभागाला जीवनदायिनी असलेले भामाआसखेड धरण शनिवारी (दि. 3) 100 टक्के भरले. दरम्यान, धरणातून 3 हजार 246 क्युसेकने भामा नदीपात्रात विसर्ग सुरू केला असल्याने धरणा खालील नदीकाठच्या गावांमध्ये पुरसदृष्य परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणून सगळ्या नागरिकांना व विशेषतः शेतकऱ्यांना सावधानता व सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाने दिला, असल्याची माहिती उपअभियंता भरत बेंद्रे यांनी दिली.
खेड तालुक्यात अनेक दिवसांपासून मुसळधार तसेच संततधार पावसामुळे भामाआसखेड धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. भामाआसखेड धरण क्षेत्रात सरासरी 90 मीमी. पाऊस पडला असून आजपर्यंत एकूण 1026 मिमी असा विक्रमी पाऊस झाला आहे. त्यामुळे धरण परिसरातील ओढे नाले अगदी वांद्रे ते गडदपर्यंत प्रचंड प्रमाणात पाणीच पाणी होऊन भामानदी काठच्या गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठची भातशेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे.
गतवर्षी भामाआसखेड धरण ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात भरले होते; परंतु यंदा जुलै अखेर वरुणराजा धो-धो बरसला आणि ऑगस्टच्या सुरुवातीलाच धरण तुडूंब भरले असून विसर्ग सुरू केल्याने भामा नदीला पूर आला आहे, त्यामुळे नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात उतरु नये. तसेच विजेवरील मोटारी, इंजिन, शेती औजारे व तत्सम साहित्ये व पशुधन यांचीही सुरक्षिततेची काळजी घेऊन कोणत्याही प्रकारची जीवित व वित्त हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन धरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.