खासदार संजय राऊत यांचे पुन्हा एकदा सूचक वक्तव्य
मुंबई : राज्यातील सत्तास्थापणेवर रोज नवनवीन भाष्य भाजप आणि शिवसेना यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यातच आता शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी सकाळी लवकरच राज्यात शपथग्रहण सोहळा होईल आणि महाराष्ट्राला लागलेले ग्रहण सुटेल, असे सूचक वक्तव्य केले. त्याचवेळी महाराष्ट्राच्या सरकार स्थापनेचा निर्णय महाराष्ट्रातच होईल इतर कुठेही होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या बोलण्याने राज्यात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
Sanjay Raut, Shiv Sena, in Mumbai: Chief Minister will be from Shiv Sena only. The face & politics of Maharashtra is changing, you will see. What you call ‘hungama’ (commotion), is not ‘hungama’, but the fight for justice & rights, victory will be ours. pic.twitter.com/2HEKba2bfM
— ANI (@ANI) November 5, 2019
महाराष्ट्रात स्थिर सरकार यावे ही इच्छा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेस आणि आमचे नेते उद्धव ठाकरे यांची असल्याचे संजय राऊत म्हणाले. सध्या फक्त न्याय आणि सत्याची लढाई सुरू आहे. पण यामध्ये विजय शिवसेनेचाच होईल आणि राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री पदावर विराजमान होईल, असे त्यांनी सांगितले.
निवडणूक निकाल लागल्यानंतर राज्यात प्रत्येक पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे. शिवसेनेच्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. कालच शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आमच्या आमदारांची संख्या आणखी वाढली असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
माझे शरद पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. ते देशाचे मोठे नेते आहेत. त्यांच्याशी बोलणे हा काही अपराध नाही. केवळ मीच नाही तर अन्य पक्षांचे कोण कोण शरद पवार यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करताहेत, हे सुद्धा मला माहिती आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.